मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या प्रवासाचा अनुभव आता कायमचा बदलणार आहे. बहुप्रतिक्षित ‘मुंबई-पुणे मिसिंग लिंक’ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकल्पामुळे खंडाळा घाटातील वळणावळणाचा रस्ता मागे पडून प्रवाशांना थेट आणि जलद मार्ग मिळणार आहे.






जगातील सर्वात रुंद बोगदा
या मार्गावर २३.५ मीटर रुंदीचा जगातील सर्वात रुंद बोगदा बांधण्यात आला आहे, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याच्या तयारीत आहे. टायगर व्हॅलीमध्ये उभारलेला ६५० मीटर लांब केबल-स्टेड पूल जमिनीपासून सुमारे १८२ मीटर उंचीवर आहे. हा पूल ताशी २०० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचाही सामना करू शकतो. सुमारे ६,६९५ कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा १३.३ किलोमीटरचा प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठीच नाही, तर देशाच्या पायाभूत सुविधांच्या नकाशावर एक मैलाचा दगड ठरणार आहे.
प्रवाशांना होणारे मोठे फायदे
मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे २५ ते ३० मिनिटांनी कमी होईल. एक्सप्रेसवेचे एकूण अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे. खंडाळा घाटातील तीव्र वळणे आणि पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या भीतीपासून प्रवाशांची सुटका होईल. आधुनिक सुरक्षेच्या सोयींमुळे हा मार्ग अधिक सुरक्षित बनवण्यात आला आहे.










