पुणे ग्रामीण भागातील सासवड जवळील ऑस्करवाडी गावाजवळ (ता.13) शुक्रवारी सायंकाळी एका तलावाच्या ठिकाणी रमजानच्या रोजा इफ्तारसाठी जमलेल्या मुस्लिम तरुणांच्या गटावर सुमारे 100 ते 150 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना घटली आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून, पोलिसांनी 10 ते 15 संशयितांना ताब्यात घेतले आहे.






घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे 6:30 वाजता घडली. तक्रारदार फिरोज जावेद सय्यद वय वर्ष 25 आणि त्याचे सुमारे 10 मित्र तलावाजवळ इफ्तारसाठी तयारी करत असताना दुचाकींवरून आलेल्या 100 हून अधिक जणांच्या गटाने त्यांची चौकशी सुरू केली.
या ठिकाणी कशासाठी आला आहात अशी विचारणा केली त्यावेळी उपवास सोडायसाठी आलो असल्याचे सांगितले असता जमावाने “ही जागा तुमची मालकीची आहे का?”, “डोक्यावरील टोप्या काढा” आणि “तुम्ही विशिष्ट वेशभूषा करून येथे का आला आहात?” असे प्रश्न विचारले, तसेच शिवीगाळ केली.नंतर जमावाने काठ्या, कोयता, चाबूक यांसारख्या हत्यारांनी तरुणांवर हल्ला केला असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
जखमी तरुणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींना पुढील उपचारांसाठी घरी नेण्यात आले. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 118 (1), 189 (2), 190 आणि इतर संबंधित कलमांखाली तसेच शस्त्र कायद्यांतर्गत गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले की, याप्रकरणी घातक शस्त्रांनी दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव, दंगल घडवणे आणि शांतताभंग यांच्याशी संबंधित कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.”10 ते 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. तपास सुरू आहे.”










