शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम, सुरक्षित व वेगवान करण्यासाठी महापालिकेकडून अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यास थोडा वेळ लागेल, मात्र कमी खर्च व वेळेचे नियोजन करून अल्पकालीन योजना प्रत्यक्षात उतरविण्यावर प्रशासनाचा भर असेल. पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विभागांना बरोबर घेऊन लोकसहभागातून डिसेंबर २०२६ या एक वर्षाच्या कालावधीत शहरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेत मोठा व चांगला बदल घडलेला दिसेल’ असा विश्वास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी व्यक्त केला.






महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकारी, अभियंत्यांसाठी शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित व वेगवान करण्यासाठी महापालिकेतर्फे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ऍड.निलेश निकम, सभागृहनेते गणेश बिडकर यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, ओमप्रकाश दिवटे, पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक अमित परांजपे, साकार रोबोटीक्सचे सहसंस्थापक डॉ.मनोज पोचट यावेळी उपस्थित होते.
“कुशल मनुष्यबळ, कायदा-सुव्यवस्था, पर्यावरण चांगले असल्यामुळे ग्लोबल कम्युनिटी सेंटर (जीसीसी), आयटी व अन्य क्षेत्रांची पुण्यात वाढ झाली आहे. असे असले तरीही नियोजितपणे विकसित होणाऱ्या पुणे शहरात वाहतुकीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे.’ असे आयुक्त राम यांनी सांगितले. ते म्हणाले, “शहरात पुणेकरांची वाहतूक केवळ ५० टक्के इतकी आहे, तर उर्वरित वाहतूक ग्रामीण भागातून पुणे शहर मार्गे पुढे जाणारी वाहतूक असल्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवते. सध्या मेट्रो, रिंगरोड, मिसिंग लिंकची कामे सध्या सुरु आहेत, पाच वर्षात ही कामे पूर्ण झाल्यानंतर २०३० नंतर पुण्यात वाहतुकीचा प्रश्न उद्भवणार नाही. म्हणूनच हा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या निधीची नव्हे, तर एकात्मिकपणे कामाची गरज आहे. रस्त्यांचे रुंदीकरण, महावितरणचे पथदिवे, फिडर बॉक्स, अनधिकृत होर्डिंग, अतिक्रमणे हटवून वॉर्डनिहाय रस्ते चांगले केल्यास २०२६ या वर्षाच्या अखेरपर्यंत शहरात मोठा व चांगला बदल घडेल.’
महापौर नागपुरे म्हणाल्या, “रिंगरोड, मेट्रो, उड्डाणपूल हे प्रकल्प पूर्ण होण्याची पुणेकरांनी वाट पहायची का ? त्याऐवजी उपलब्ध साधनांमधून वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आपण ठोस प्रयत्न केले पाहिजेत. महापालिकेच्या वॉर्डमधील एका कर्मचाऱ्याने जागल्याचे काम केल्यास बहुतांश छोट्या-छोट्या समस्या सुटू शकतात. नागरिकांच्या सूचनांचा वापर केला पाहिजे. प्रत्येक कामावर पर्यवेक्षण करून संबंधित कामाला गती दिली जाऊ शकते. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरही करता येईल. पुणेकरांना चांगले पर्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत.’ अनिरुद्ध पावसकर यांनी दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे वाहतुकीची सद्यःस्थिती मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर गोजारे यांनी केले.
“देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहर ३० वर्षात तब्बल ३०० टक्के वाढले आहे. त्या तुलनेत पायाभूत सोई-सुविधा तितक्या झपाट्याने वाढू शकत नाहीत. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. तरीही अल्प खर्चात वाहतूक व्यवस्थापनावर भर दिला. मेट्रो, रिंगरोड हे प्रकल्प होतील, मात्र विज्ञान, तंत्रज्ञानाचा उपयोग करून वाहतुकीची समस्या सोडविली जाऊ शकते. त्यादृष्टीने रस्ते रिसर्फेसिंग केल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुधारली आहे.”
– मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुणे पोलिस











