पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ अशी लोकप्रिय घोषणा दिली होती. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा जबाबदारी हाती घेतली. मागच्या ११ वर्षांत भ्रष्टाचाराची स्थिती कशी आहे. त्यात किती सुधार झाला? असे अनेक प्रश्न आहेत. जगभरातील १८० देशांत होणाऱ्या भ्रष्टाचाराची माहिती गोळा करून ग्लोबल ट्रान्सपरन्सी या संस्थेकडून दरवर्षी अहवाल सादर केला जातो. २०२५ सालात कोणत्या देशात भ्रष्टाचाराची स्थिती कशी होती? याची यादी करण्यात आली आहे.






सर्वांत भ्रष्ट देश कोणते?
दक्षिण सुदान आणि सोमालिया हे जगातील सर्वात भ्रष्ट देश म्हणून गणले गेले आहेत. १८० देशांमध्ये सरकारमध्ये किती पारदर्शकता आहे, संस्थांची प्रामाणिकता कशी आहे? याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यावरून काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
भ्रष्टाचाराचे निकष कसे ठरतात?
ग्लोबर ट्रान्सपरन्सी संस्थेकडून १८० देशांचा ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स’ तयार करण्यात येतो. यात शून्य गुण म्हणजे ‘सर्वाधिक भ्रष्ट’ आणि १०० गुण म्हणजे ‘सर्वात पारदर्शक किंवा स्वच्छ’ असा शेरा दिला जातो. जगातील १२२ देशांचे गुण हे ५० च्या खाली आहेत. याचा अर्थ दोन तृतीयांश देश अधिक भ्रष्ट असल्याचे दिसते.
भारताचे स्थान कितवे?
ग्लोबल ट्रान्सपरन्सीच्या अहवालानुसार, भारताची स्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे. २०२५ मध्ये भारताला ३९ गुण देण्यात आले आहेत. १८० देशांच्या यादीत भारत आता ९१ व्या क्रमांकावर आहे. २०२४ नंतर भारताच्या स्थितीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या तीन वर्षांपासून भारताच्या स्थितीत सुधारणा होत आहे.
मागच्या तीन वर्षात भारताच्या स्थानात सकारात्मक बदल झाले आहेत. २०२३ साली भारत भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात (Corruption Perceptions Index) ९३ व्या स्थानावर होता. २०२४ साली ही संख्या घसरून भारत ९२ व्या तर आता ९१ व्या स्थानावर आला आहे. पण ही सुधारणा कोणत्या मुद्द्यांवर झाली, याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही.
टॉप ५ स्वच्छ देश (पुढे गुण)
१) डेन्मार्क – ८५
२) फिनलँड – ८८
३) सिंगापूर – ८४
४) न्यूझीलंड – ८१
५) नॉर्वे – ८१
टॉप ५ भ्रष्ट देश
१) दक्षिण सुदान – ९
२) सोमालिया – ९
३) व्हेनेझुएला – १०
४) येमेन – १३
५) लिबिया – १३
६) भारत – ३९
युरोप आणि अमेरिकेत भ्रष्टाचाराची प्रकरणे वाढत जात आहेत. अशावेळी भारताचे स्थान सुधारत आहे. भारतात चिरी-मिरी देऊन सर्व काही कामं होतात, असा एक समज आहे. शिपाई स्तरापासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यापर्यंत सर्वच लोक भ्रष्टाचारात गुंतल्याची अनेक प्रकरणे आजवर समोर आलेली आहेत. मात्र काळानुरुप भ्रष्टाचाराचे स्वरुप बदलत आहे.











