दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता या प्रकरणाला एक नवं वळण मिळाले आहे. ज्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या विमानाने अजित पवारांनी प्रवास केला होता, त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके अत्यंत सुमार दर्जाची होती, अशी माहिती समोर आली आहे. युरोपियन हवाई नियामक संस्था EASA (European Union Aviation Safety Agency) ने या कंपनीवर एक वर्षापूर्वीच बंदी घातली होती, तरीही ही कंपनी भारतात सेवा कशी देत होती? असा सवाल आता उपस्थित होत आहे.






काय आहे ‘लेव्हल १’ सुरक्षा त्रुटी?
EASA च्या अहवालानुसार, व्हीएसआर व्हेंचर्सला ‘लेव्हल १’ या सर्वात गंभीर श्रेणीतील सुरक्षा त्रुटींच्या यादीत टाकण्यात आले होते. हवाई वाहतूक क्षेत्रात ‘लेव्हल १’ चा अर्थ असा होतो की, संबंधित कंपनीकडे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणताही ठोस शाश्वती नाही किंवा ती कंपनी तपासात सहकार्य करत नाहीये. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या कंपनीचा ‘थर्ड कंट्री ऑपरेटर’ (TCO) परवाना निलंबित करण्यात आला होता.
२०२३ च्या अपघाताची माहिती लपवली
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत या कंपनीच्या एका ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात झाला होता. या अपघाताबाबत EASA ने वारंवार तांत्रिक माहिती मागवूनही कंपनीने ती पुरवली नाही. ऑक्टोबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत EASA ने कंपनीला ५ वेळा स्मरणपत्रं पाठवली. तरीही कंपनीने अंतर्गत चौकशी अहवाल देण्यास नकार दिला आणि सुरक्षा मानकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
कंपनीच्या याच असहकार्यामुळे युरोपियन हवाई क्षेत्रात या कंपनीच्या उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, युरोपियन युनियनने या बंदीच्या आदेशाची प्रत भारताच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाला पाठवली होती. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कंपनी ‘धोकादायक’ ठरवण्यात आली होती, तर महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी या कंपनीच्या विमानाला परवानगी कशी मिळाली? या प्रश्नामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणावर अद्याप डीजीसीएनं प्रतिक्रिया दिली नाही.
तपास आता सीआयडीकडे
गेल्या आठवड्यात बारामती जवळ कोसळलेले विमान देखील याच वादग्रस्त कंपनीचे होते. या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र सरकारने तपासाची सूत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवली आहेत. केंद्रीय पथकाने (AAIB) विमाकाचा ‘ब्लॅक बॉक्स’ जप्त केला असून, त्यातील डेटावरून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.











