राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना आता ईकेवायसीचा फटका बसला आहे. ईकेवायसीची ३१ डिसेंबर २०२५ची मुदत उलटून गेल्यानंतर राज्यातील ४५ लाख महिला या योजनेतून बाद झाल्या आहेत तर २६ लाख महिलांना ईकेवायसी केल्यानंतरही त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.आता या २६ लाख महिलांनी ऑनलाइन भरलेल्या माहितीची पडताळणी होणार असून याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे.






राज्य सरकारने विधानसभा निवडणूक काळात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच कोटींहून अधिक महिलांनी यात नोंदणी केली. यामध्ये सरकारी नोकरीतील महिला तसेच काही पुरुषांकडूनही नोंदणी करण्यात आली होती. अशा बोगस लाभार्थ्यांना या योजनेमधून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून ईकेवायसी नोंदणी मोहीम राबविण्यात आली. यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली. अंतिम मुदतवाढ ही ३१ डिसेंबर २०२५ ही होती. मात्र त्यानंतरही राहिलेल्या २ कोटी ३५ लाख महिलांमधील केवळ १ कोटी ९० लाख महिलांचीच ईकेवायसी नोंदणी पूर्ण झाली.
३१ डिसेंबरची मुदत उलटून गेल्यानंतर आणि त्याकाळात नगरपालिका महापालिका निवडणुका लागल्यामुळे नवीन मुदतवाढ देण्यात आली नाही. याचा फटका सुमारे ४५ लाख महिलांना बसला असून त्या या योजनेतून बाद झाल्या आहेत. महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिला दोनदा मुदतवाढ देऊनही नोंदणीसाठी पुढे न आल्याने त्यांना आता या योजनेतून बाद करण्यात आले आहे. अशा महिलांसाठी नवीन मुदतवाढ देण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप विभागाकडे नाही.
२६ लाख महिलांनी ईकेवायसीत निवडला चुकीचा पर्याय
२६ लाख महिलांनी ईकेवायसीत चुकीचा पर्याय निवडला यामध्ये कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा नाही याची नोंद करताना या महिलांकडून गल्लत झाल्याचे महिला व बालविकास विभागाचे म्हणणे आहे. याची पडताळणी आता अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येणार आहे. या सर्व २६ लाख महिलांची यादी त्या त्या जिल्ह्यांत पाठविण्यात आली असून त्या त्या विभागात घरोघरी जाऊन या महिलांच्या घरात खरोखरच सरकारी नोकरीतील व्यक्ती आहे किंवा नाही याची पडताळणी झाल्यानंतरच या महिलांना लाडकी बहीणचा हप्ता सुरू होणार आहे.
अंगणवाडी सेविकांचा पडताळणीस नकार
या महिलांची पडताळणी करण्यास अंगणवाडी सेविकांकडून मात्र नकार देण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेत अर्ज बाद झाल्याने अंगणवाडीसेविकांना या महिलांकडून उलटसुलट प्रश्न केले जात असून प्रसंगी त्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी या कामास विरोध दर्शवला आहे. असे असले तरी येत्या काही दिवसांत पुन्हा अंगणवाडी सेविका या कामाला लागतील व सर्व पडताळणी पूर्ण होईल, अशी आशा महिला व बालविकास विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.











