मुंबई दि. २६ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती आणि शिवडी विभाग गटक्रमांक १३ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे विभागाचे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रजासत्ताक दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.






सदर प्रसंगी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली व बाबासाहेबांना अभिवादन करुन संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले तद्नंतर गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, विभागीय कार्याध्यक्ष संतोष जाधव समाजभूषण पुरस्काराने पुरस्कृत भगवान साळवी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर कार्यक्रमानिमित्त भगवान साळवी, संतोष जाधव, संदीप मोहिते, प्रविण तांबे यांनी आपले अमूल्य विचार व्यक्त केले, तद्नंतर अध्यक्ष या नात्याने राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष, अकरा महिने, सतरा दिवस रात्रंदिवस कष्ट करून जे संविधान निर्माण केले ते प्रजासत्ताक भारत राष्ट्राला २५ नोव्हेंबर १९४९ साली बहाल केले परंतु त्याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० झाली व आज त्यास ७५ वर्षे झाली आहेत त्या अमृत महोत्सवाच्या सांगता वर्षानिमित्त हा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. संविधानामुळे भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मिळण्याची हमी या संविधानाने दिली. म्हणूनच, आजच्या या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी एकत्र, एकसंघ राहून आपल्या देशाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. गुलामीच्या साखळदंडातून मुक्त होताना लाल किल्ल्यावर इंग्रजांचा ध्वज खाली उतरवून आपला तिरंगा दोरीला बांधून वर फडकवण्यात आला. हा क्षण आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि बलिदानाचा गौरव करणारा होता. परंतु २६ जानेवारीचा दिवस वेगळे महत्त्व सांगतो. या दिवशी भारताचा ध्वज राष्ट्रपतींच्या हस्ते वर नेऊन फडकवण्यात येतो. हा मान देशाच्या राष्ट्रपतींना दिला जातो, कारण या दिवशी भारत एक स्वतंत्रच नव्हे तर संविधानाच्या आधारे चालणारा प्रजासत्ताक देश झाला १५ ऑगस्ट रोजी भारत देश स्वतंत्र झाला गुलामीतून मुक्त झाला म्हणून लाल किल्ल्यावर आपला ध्वज दोरीला बांधून वर पाठवला व इंग्रजांचा ध्वज खाली आणला त्यानंतर तीन वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्वतंत्र भारताला संविधान बहाल केले त्यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज वर नेऊन फडकवण्यात आला तिचं परंपरा आजही सुरू आहे. म्हणूनच, हा प्रजासत्ताक दिन आपल्याला केवळ ध्वजवंदनापुरता मर्यादित न ठेवता, संविधानातील मूल्ये आपल्या आचरणात उतरवण्याची प्रेरणा देतो. देशातील एकता, अखंडता आणि बंधुता जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.” असे नमूद करून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास विभागातील संलग्न सर्व शाखा त्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद, नरेंद्र मोहिते, जगन्नाथ जाधव, वायंगणकर, अनंत मोहिते, सुरेंद्र महाडिक, प्रकाश तांबे, काशिनाथ पवार, प्रताप तांबे, शिक्रे, दर्शन जाधव, अजय पवार, मंगेश जाधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, कामगार, व्यापारी वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून विभागीय चिटणीस संदीप मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.











