बालगंधर्व येथे ‘शतकवीर बाळकडू’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे बिहार भवन निषेधाची फीत कापून दिमाखदार उद्घाटन

0

पुणे: शिवसेना प्रमुख, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रसिद्धी प्रमुख श्री. अनंत घरत यांच्या आयोजनातून ‘शतकवीर बाळकडू’ या भव्य व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज बालगंधर्व कलादालन येथे उत्साहात पार पडले.

या वेळी बिहार भवन निषेधाची फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना उपनेत्या मा. सुषमा ताई अंधारे व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ मा. असीमजी सरोदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, तरुण कार्यकर्ते व कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रदर्शनात प्रसिद्ध व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक, निर्भीड आणि सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या शैलीतील ही व्यंगचित्रे आजच्या राजकीय परिस्थितीवर नेमके भाष्य करणारी आहेत. सत्तेचा दुरुपयोग, राजकीय उलथापालथ, विचारधारांचा विसर, पिसासू सत्ताकांक्षा आणि वैतागलेला मतदार या सर्व विषयांवर ही व्यंगचित्रे बोलकी व संवेदनशील भाष्य करतात.

अधिक वाचा  कर्वेनगरमध्ये मुठा नदी जलपर्णी काढण्यास सुरुवात; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांच्या प्रयत्नाला यश

यावेळी बोलताना मा. सुषमा ताई अंधारे म्हणाल्या, “ही व्यंगचित्रे म्हणजे आजच्या महाराष्ट्राची आरशासारखी मांडणी आहे. शिवसेना आणि व्यंगचित्रांचा संबंध जन्मापासूनचा आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे सामर्थ्य या व्यंगचित्रांमध्ये आहे.”

आयोजक श्री. अनंत घरत म्हणाले, “देश व राज्यातील सद्य परिस्थिती पाहता प्रत्येक नागरिक अस्वस्थ आहे. जनतेच्या मनातील भावना, सत्तेचा दुरुपयोग, राजकीय साठमारी आणि वैचारिक अधःपतन यावर नेमके भाष्य करणारे हे प्रदर्शन आहे. शिवसेना पुणे शहराच्या माध्यमातून या प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे.”

या प्रसंगी शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, युवासेना शहर अधिकारी युवराज पारिख यांच्यासह अनेक ज्येष्ठ व तरुण शिवसैनिक उपस्थित होते.

अधिक वाचा  अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी; सुनेत्रावहिनी पवार प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

‘शतकवीर बाळकडू’ व्यंगचित्र प्रदर्शन दिनांक २१ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत बालगंधर्व कलादालन येथे सर्व रसिक प्रेक्षकांसाठी खुले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.