राज्यात यंदा पावसाने हाहाकार माजवला आहे. आज अनेक ठिकाणी पावसाची उघडीप आहे, पण विदर्भात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, तर भंडारा, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.विदर्भातील काही भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.






उद्या, शुक्रवारी गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट असेल. उत्तर ओडिशा आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीणकुमार यांनी दिली.
पुण्यात काय परिस्थिती असेल?
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या इतर भागांतही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवार आणि शनिवारी विदर्भ, मराठवाडा, खानदेश वगळता मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. या दोन दिवसांत राज्यात ढगाळ वातावरण राहून बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे.
पावसाचा धोका कायम
25 ते 29 सप्टेंबरदरम्यान राज्यात जोरदार पावसाचा धोका कायम राहील. विशेषत: 27 सप्टेंबरला मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा आहे.
पावसामुळे मोठे नुकसान
राज्यात सध्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले आहे. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभी पिके पाण्याखाली गेली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. पाण्यामुळे सरकारला पंचनामे करणेही कठीण झाले आहे.
यंदा एवढा पाऊस का?
यंदा महाराष्ट्रात, विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात जास्त पावसाचे कारण बंगालच्या उपसागरात, विशेषत: आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र पश्चिमेकडे सरकताना मराठवाडा आणि विदर्भातून जाते, तेव्हा तिथे मुसळधार किंवा अतिवृष्टी होते. यंदा अशी दोन कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाली, ज्यामुळे या भागांत जास्त पाऊस पडला. सामान्यत: बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात अशी यंत्रणा तयार झाल्यास मध्य प्रदेश किंवा मध्य भारतात जास्त पाऊस पडतो. मात्र, यंदा ही क्षेत्रे उपसागराच्या मध्यभागी तयार झाली आणि पश्चिमेकडे सरकल्याने महाराष्ट्रात, विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात जास्त पाऊस झाला, अशी माहिती हवामान तज्ज्ञ एस. जी. सानप यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.













