मनोज जरांगेंचं गोदाखोऱ्यातून पुन्हा ‘चलो मुंबई’ मिशन; पण 29 ऑगस्टच्या तारखेमागेच खूप मोठं गुपित दडलय?

0

महाराष्ट्रातील सरसकट मराठा बांधवांसाठी ओबीसी आरक्षण मिळावे आणि सगेसोयरे अध्यादेश लागू करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठवाड्यातील गोदाखोऱ्यातून एल्गार पुकारला आहे. 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी भगवं वादळ मुंबईत धडकणार असले तरीसुद्धा या आरक्षण एल्गार मोर्चाचे मार्गक्रमण पाहता मनोज जरांगे यांच्या नियोजनामध्ये एक मोठं गुपित घडलं आहे का असा सवाल निर्माण झाला आहे. मुळात अंतरावली सराटीतून मुंबईसाठी जाण्यास अहमदनगर मार्गे सरळ मार्ग असतानाही मनोज जरांगे यांनी शहागड पैठण शेवगाव या मार्गे मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेण्यामागचा कारण काय? हा मोठा एक यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यात वंजारी मराठा वाद शिगेला पोहोचलेला असताना शहागड मार्गे पैठण मार्ग निवडण्याच्या मागे वेगळी रणनीती असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

अधिक वाचा  छत्रपती संभाजी महाराजांची ‘मॉडर्न आर्ट’च्या नावे अवहेलना; नव्याने बसविलेल्या पुतळ्याचा वाद; शिवप्रेमी संघटना आक्रमक

अंतरवाली सराटीतून 27 ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे यांचे ‘मिशन चलो मुंबई’ सुरू होणार असून शहागड ला जाण्यासाठी बीड जिल्ह्यात सुरुवातीलाच शक्ती प्रदर्शनातून सध्या चर्चेत असलेल्या प्रश्नाला सांकेतिक उत्तर देण्याचे प्रयत्न या मोर्चातून केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहागड – पैठण मार्गे शेवगाव – पांढरी पूल (मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला या पट्ट्यात सुरुवातीपासून खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे त्याच भागातून मोठा जनसमुदाय एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन) पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे मराठा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी दर्शन (कदाचित मुक्काम) मुंबईच्या दिशेने भरीव शक्ती प्रदर्शनाने कल्याण,वाशी, चेंबूर या मार्गे मोर्चा 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार आहे. मराठी समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले नाही. सगेसोयरे अध्यादेश आणि त्याची अंमलबजावणीची अजूनही प्रतिक्षा आहे. त्यातच मुंबईत येणारा मराठ्यांचा मोर्चा अडवला तर राज्यासह केंद्रालाही गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जरांगेंनी दिलाय.

अधिक वाचा  राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, दिल्ली पोलिसांत पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, FIR मध्ये मात्र अजब नोंद

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जानेवारी 2024 मध्ये मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचा मसुदा मनोज जरांगेंच्या हाती सोपवला होता. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यातच मुंबईमध्ये गणेश उत्सवाच्या काळामध्येच मराठा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल होत असल्याने गृहमंत्रालयाला या परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. मुंबई पुणे भागामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा गणेश उत्सव साजरा केला जात असताना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संबंधित मोर्चा मुंबईमध्ये दाखल होणे ही नवी समस्या निर्माण होणार आहे. चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याच्या हेतूनेच मिशन चलो मुंबईची तारीख आणि मार्गक्रमण ठरवण्यात आले आहे की काय अशी नवी चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे यावेळी मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या मागण्या काय असणार आहेत?

  • मराठा कुणबी एक असल्याचा जीआर काढा
  • हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा
  • आरक्षणासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा
  • मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या
  • मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्याच्या वारसांना नोकरी द्या
अधिक वाचा  महसूल विभागात मोठी भरती! 2122 कोतवाल भरती; जिल्हाधिकाऱ्यांच्या निवड समितीमार्फत ही भरती होणार

दरम्यान, राजकीय पक्षांच्या भूमिका, सत्ताधाऱ्यांची उदासीनता, आणि आरक्षणप्रश्नी सुरू असलेला वेळकाढूपणा यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजात पुन्हा एकदा आंदोलनाची लाट उसळू लागलीय़. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनावर सरकार तोडगा काढणार का? की जरांगेंच्या मोर्चानं सत्ताधाऱ्यांसह मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांची उत्सव काळामध्ये कोंडी होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलय.