सावित्रीबाई फुले या भारतातील आद्य कवियत्री आणि प्राध्यापिका होत्या – सौ. नंदा कांबळे

0

मुंबई दि. ३ (रामदास धो. गमरे) “मौर्य साम्राज्य कमकुवत झाल्यानंतर मनुस्मृतीचा उदय झाला व या मनुस्मृतीच्या माध्यमातून दलीत, पीडित, महिला व सर्वसामान्य माणसांना जीवन जगणे कठीण झाले अनेक अन्याय, अत्याचाराने जनता हैराण होती सोबतच जाचक प्रथा, परंपरा, रूढी आणि अंधश्रद्धा यांनी कळस गाठला होता अश्या परिस्थितीत त्याकाळी सावित्रीबाई फुले आणि क्रांतीज्योती महात्मा फुले या दांपत्याने अन्यायाविरुद्ध बंड पुकारून १ जानेवारी १८१८ साली भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली १८४८ ते १८५२ या चार वर्षात सावित्रीबाईंनी मुलींच्या १८ शाळा सुरू करून मनुवादी व्यवस्थेला धक्का दिला, महात्मा फुलें सोबत त्यांच्या कार्यात सहभागी होऊन त्यांनी अनेक कामे केली, सोबतच त्यांना फातिमा शेख नावाची एक मुलगी भेटली तिला ही शिक्षण देऊन मोठ केलं, फातिमाने ही सावित्रीबाईंना साथ दिली. सावित्रीबाईंनी बालविवाह, सती प्रथा, विधवा केशवपन या सर्व अनिष्ट रूढी व प्रथा त्यांनी बंद पाडल्या तसेच बलात्कार व अन्याय झालेल्या महिलांना साहरा व संरक्षण दिले, भ्रूणहत्या प्रतिबंधक गृह निर्माण करून त्यांनी अनेकांना साहरा दिला त्यातील अनेक मुली या ब्राम्हण समाजाच्या होत्या त्यांना त्यांनी संरक्षण दिले, अनेक अनाथ मुलींना त्यांनी वाढवले अशी अनेक महत्कार्य करणाऱ्या सावित्रीबाईंनी कोणालाही न जुमानता अन्यायाविरुद्ध बंड केले, त्यावेळी त्यांचा भाऊ स्वतः त्यांना म्हंटला की ताई तू हे जे करते ते बरोबर नाही, पण त्याला उत्तर देत सावित्रीबाई म्हणाल्या की देव कोण ते मला माहित नाही पण माझा नवरा जे काम करतो ते खर आहे तो त्यांचा देव आहे.. अस त्यांनी भावाला पटवून त्याच मनपरिवर्तन केले. एका ब्राम्हण स्त्रीवर अन्याय झाला व त्यातून एक अनौरस मूल जन्माला आल त्या मुलाला सावित्रीबाईंनी दत्तक घेतलं व त्याच नाव यशवंत ठेवून त्याच पालन पोषण करून त्या मुलाला डॉक्टर बनवून त्याला स्वतःच्या पायावर उभे केलं, महात्मा फुलेंच्या निधनानंतर प्लेगची साथ आली असताना सावित्रीबाईंनी मोठे काम केले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांची त्यांनी सेवा केली. सावित्रीबाईंनी अन्यायाविरुद्ध काव्यलेखन ही केलं म्हणून आद्य कवियत्री आणि प्राध्यापिका या सावित्रीबाई फुले या होत्या, आज काही मनुवादी विचारसरणी सावित्रीबाईंच काम दडपण्याचा कट करीत आहेत पण आम्ही सावित्रीच्या लेकी हे खपवून घेणारं नाही” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख व्यक्ते म्हणून बोलत असताना मुख्याध्यापिका नंदा शरद कांबळे यांनी केले.

अधिक वाचा  डिजिटल मीडिया संघटनेच्या अध्यक्षपदी राजा माने

बौद्धजन पंचायत समिती संलग्न महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती महोत्सव उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सावित्रीबाईंच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, सचिव मनोहर बा. मोरे यांनी आपल्या गोडवाणीने धार्मिक विधी पठण केले तद्नंतर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या पहाडी आवाजात व लाघवी भाधाशेलीत प्रास्ताविक सादर करीत असताना सावित्रीबाईंच्या जीवनपटाचा आढावा घेत सावित्रीबाई या आद्य सुधारक, आद्य शिक्षिका होत्या असे नमूद केले. माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे आपले विचार मांडीत असताना “सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, स्त्री पुरुष समानता या कार्यात त्यांनी मोठे योगदान देऊन समाज प्रबोधनासाठी त्यांनी काव्यलेखन केले आहे” असे नमूद केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मंडळाच्या चिटणीस अंजलीताई मोहिते यांनी आपल्या लाघवी भाषाशैलीत अत्यंत प्रभावीपणे केले.

अधिक वाचा  उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात टीकेत वाढ; तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात प्राथमिक अहवाल या दिवशी?

अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष व समितीचे उपसभापती विनोद मोरे यांनी “सावित्रीबाईंचे कार्य हे त्याकाळात कसे केलं आहे याचा विचार करणेही कठीण आहे कारण दोनशे वर्षांपूर्वी या देशात मनुस्मृती पगडा इतका होता की सर्वसामान्य तळागाळातील लोकांना जगणे ही मुश्किल होत त्यावेळी त्या बेबंदशाहीला सुरुंग लावण्याच काम सावित्रीबाईंनी मोठ्या हिमतीने केले परंतु आजच्या काळात ही काही ठिकाणी मनुवादी विचारसरणी महिलांवर अत्याचार करीत आहे तर काही ठिकाणी नवरा मुलगा घोड्यावरून गेला म्हणून त्याला मारहाण केली जाते अशी अनेक उदाहरणे आजही दिसून येतात आज ही परिस्थिती असेल तर त्या काळात काय परिस्थिती असेल याचा विचार ही करवत नाही तरी त्याकाळी बंड पुकारून उपेक्षित समाजाला स्वतःच्या हिमतीने अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे काम तसेच अनेक गोरगरीब, आबालवृद्धांना आधार देऊन त्यांचे संगोपन करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले, परंतु आजच्या आधुनिक सुशिक्षित काळात या महापुरुषांच्या कार्याकडे जाणूनबुजून कानाडोळा केला जातो, माझ्या सोबत काम करणाऱ्या एका सहकर्मचाऱ्यास वाढदिसानिमित्त महात्मा फुले व सावित्रीबाईंची प्रतिमा दिली होती काही दिवसानंतर मी परत त्यांच्याकडे गेलो असता ते फोटो मला दिसले नाही म्हणून मी चौकशी केली असता माझे सहकर्मचारी म्हणाले की लोक मला म्हणतात तुम्ही या प्रतिमा घरात का लावल्या तुम्ही बौद्ध आहात का ? म्हणजे आजही शिकली सवरलेली सुशिक्षित माणसं महापुरुषांच्या नावाने नाक मुरडत आहेत व त्यांचा इतिहास पुसण्याचे काम करीत आहे म्हणून नवीन पिढीने जागरूक राहून बहुजन समाजातील महापुरुषांचा विचार आत्मसात करून पुढील पिढीकडे पोहचवला पाहिजे” असे प्रतिपादन केले.

अधिक वाचा  राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची एकाच दिवशी निवड! ‘हा’ असेल मुहूर्त

सदर कार्यक्रमास कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, सचिव यशवंत कदम, श्रीधर जाधव, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, महिला मंडळ अध्यक्षा सुशीलाताई जाधव, अंजलीताई मोहिते, सायली साळवी, महिला मंडळाच्या कार्यकर्त्या, शिवडी गटक्रमांक १३ मधील शाखा ५७८ मधील महिला मंडळ, विभागातील महिला, सर्वच पदाधिकारी, सदस्य, सभासद, कार्यकर्ते, बौद्धाचार्य शिबिरात सहभागी झालेले शिबिरार्थी उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी राजेश घाडगे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.