मला माफ करा बाबा! मला हे आयुष्य आवडत नाहीये, मी आता जगू शकत नाही, मी जाते… असं म्हणत मुलीने तिचं आयुष्य संपवलं आहे. मृत्यूला कवटाळण्याआधी रिधानाने तिच्या वडिलांना पत्र लिहिलं आणि मनातल्या सगळ्या वेदना सांगून टाकल्या. 27 वर्षांच्या रिधान्याने हुंड्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. वडिलांनी रिधान्याच्या सासरी 300 सोन्याचे शिक्के आणि आलिशान व्हॉल्वो कार दिली होती, तरीही तिचा हुंड्यासाठी छळ झाला.
हुंड्यासाठी सासरी छळ
हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने रिधान्याने जीवन संपवलं, यानंतर तिचा पती आणि सासरच्यांना पोलिसांनी अटक केली आहे. रिधान्या कापड उत्पादक अन्नादुराई यांची मुलगी होती. याच वर्षी एप्रिल महिन्यात रिधान्याचं 28 वर्षांच्या कविन कुमार याच्यासोबत लग्न झालं होतं.
रिधान्याच्या वडिलांनी हुंड्यामध्ये 500 सोन्याची नाणी आणि 70 लाख रुपयांची आलिशान व्हॉल्वो कार द्यायचं आश्वासन दिलं होतं. लग्नामध्ये त्यांनी रिधान्याच्या सासरच्यांना 300 नाणी दिली, पण उरलेल्या 200 नाण्यांसाठीचा दबाव वाढतच राहिला, त्यामुळे रिधान्याचा सासरी छळ करण्यात आला.
कारमध्ये संपवलं आयुष्य
शनिवारी रिधान्या मोंडिपलायम मंदिरात जात असल्याचे सांगून तिच्या सासरच्या घरातून निघून गेली. काही तासांनंतर, पोलिसांना परिसरात एका कारची माहिती मिळाली. आत त्यांना रिधान्या बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि तिच्या तोंडातून फेस येत होता. रिधान्याने कीटकनाशक गोळ्या खाल्ल्याचं सांगण्यात येत आहे. रिधान्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आणि रविवारी शवविच्छेदनानंतर कुटुंबाला सोपवण्यात आला.
वडिलांना व्हॉट्सअॅप व्हॉइस मेसेज
मृत्यूच्या काही काळापूर्वी तिच्या वडिलांना सात व्हॉट्सअॅप व्हॉइस मेसेज पाठवण्यात आले होते. यामध्ये रिधान्याने तिला काय सहन करावे लागले हे सविस्तरपणे सांगितले. तिने तिच्या पती आणि त्याच्या पालकांवर दररोज मानसिक छळ करण्याचा आणि कविनवर अत्याचार करण्याचा आरोप केला. ‘मला हे जीवन आवडत नाही. मी आता जगू शकत नाही. तुम्ही आणि आई माझे जग आहात. मला माफ करा, बाबा – सर्व काही संपले आहे. मी जात आहे.’, असं रिधान्या तिच्या व्हॉइस मेसेज मध्ये म्हणाली.
जुळवून घेण्याचा वडिलांचा सल्ला
‘लग्नानंतर रिधान्या 15 दिवसांमध्येच घरी परतली तेव्हा ती खूप दुःखी आणि अस्वस्थ होती. मी तिला जुळवून घ्यायला सांगितलं, पण शेवट असा होईल हे मला वाटलं नव्हतं’, अशी प्रतिक्रिया रिधान्याच्या वडिलांनी दिली आहे.
100 कोटी रुपयांची इच्छा
‘रिधान्याच्या सासरच्यांनी त्यांना मिळालेल्या हुंड्याची तुलना इतरांशी केली. रिधान्याच्या सासरच्या लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर वरांना मिळाले तसेच 100 कोटी रुपये पाहिजे होते. त्यांनी आम्हाला फसवलं’, असा आरोप अन्नादुराई यांनी केला आहे. याप्रकरणी तामीळनाडूच्या तिरुपूरमधल्या चेय्यूर पोलिसांनी कविन कुमार त्याचे पालक इश्वरमूर्ती आणि चित्रादेवी यांना अटक केली आहे.