शिवसेना ठाकरे गटात मोठी हालचाल! सर्व आमदार, खासदारांना महत्त्वाचे निर्देश आगामी निवडणुकीबाबत चर्चा होणार का?

0

मुंबईत महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या घडामोडी घडत आहेत. कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळेच राजकीय वर्तुळात बैठकांचा धडका चालू आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटकपक्षांना गळती लागली आहे. ठाकरे गट, काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मात्र डिनर डिप्लोमसीची मदत घेतली जात आहे. त्यांनी आपल्या आमदार आणि खासदारांना खास जेवणासाठी आमंत्रित केलंय.

नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी आपल्या आपल्या पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदार यांना जेवणासाठी आमंत्रित केलंय. उद्या म्हणजेच 20 जून रोजी मुंबईतील ताज लँड्समध्ये डिनर डिप्लोमसीचा हा कार्यक्रम होणार आहे. ठाकरेंनी सर्वच आमदार आणि खासदारांना या जेवणासाठी बोलावलं आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

डिनर डिप्लोमसीचं कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात अनेक घडामोडी घडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक माजी आमदार, नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात काही खासदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशा बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. विशेष म्हणजे ठाकरे पक्षातील खासदार शिंदे गटात जाणार असून त्यासाठी चाचपणी केली जातेय, अशीही माहिती सूत्रांकडून आली होती. त्यामुळे ठाकरेंनी दिलेल्या या जेवणाच्या आमंत्रण कार्यक्रमात या विषयावर काही चर्चा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

आगामी निवडणुकीबाबत चर्चा होणार का?

राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यासाठी रणनीती आखली जात आहे. ठाकरे यांच्या पक्षासाठी तर मुंबईची पालिका निवडणूक फारच प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायचीच असा निश्चय ठाकरे गटाने केला आहे. तसेच ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यासारख्या महापालिकाही ठाकरे गटासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे आमदार खासदारांसोबतच्या डिनर डिप्लोमसीमध्ये उद्धव ठाकरे याविषयीही काही मार्गदर्शन करणार का? असे विचारले जात आहे.