छगन भुजबळांनी मंत्रपदी शपथ घेताच; मंत्रालयातही हालचालींना सुरुवात भुजबळांची ही सुचक प्रतिक्रिया

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रि‍पदाची शपथ घेतली. महायुती सरकारच्या स्थापनेवेळी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. त्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज होते. अखेर पाच महिन्यांनी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी छगन भुजबळ यांना मंत्रि‍पदाची शपथ दिली आणि त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

छगन भुजबळ यांचा शपथविधी आटोपताच मंत्रालयात हालचाली सुरु झाल्या आहेत. मंत्रालयातील धनंजय मुंडे यांचा 204 क्रमांकाचा कक्ष उघडण्यात आला आहे. तब्बल दोन महिन्यांनी हा कक्ष उघडला गेला असून आता याठिकाणी साफसफाईचे काम सुरु आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांना मंत्रालयातील विस्तारित इमारतीत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील 202 क्रमांकांचे दालन मिळण्याची शक्यता आहे. हे दालन याआधी धनंजय मुंडे यांना देण्यात आले होते. परंतु त्यांच मंत्रिपद गेल्यानंतर त्यांचं खात आणि त्यांना देण्यात आलेले दालन देखील छगन भुजबळ यांना मिळण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  पुणे विषारी दारू दुर्घटनेनंतर दारू माफियांविरोधात राज्यव्यापी ‘स्ट्राईक’ आठ दिवसांत ३,३१२ गुन्हे; २,७५७ अटक, ७४ हजार लिटर गावठी दारू जप्त

साधारण आठ दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांच्या वरळी येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक पार पडली. या भेटीनंतर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फोनवरून बोलणं झालं आणि त्यानंतर भुजबळ यांचे मंत्रिपद निश्चित करण्यात आले. ओबीसी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आल्यामुळे ओबीसी समाजात नाराजी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसू शकतो. हे सगळे मुद्दे पाहता भुजबळांना मंत्रीपद देऊन ओबीसी नाराजी रोखण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचे समजते.

अधिक वाचा  पुण्यातील वाहतूक कोंडी होणार दूर! ‘एआय’ लावणार शहराच्या वाहतुकीला शिस्त, असा आहे प्लॅन?

मंत्रि‍पदाची शपथ घेण्यापूर्वी छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना मंत्रि‍पदाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर छगन भुजबळांनी म्हटले की, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं.  यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.