साखर उत्पादन ५८ लाख टनांची घट तुटवडा जाणवणार?; गाळप उपलब्धता कमी अन् साखर उतार .८० टक्क्यांची घट

0

गाळपासाठी उसाची कमी उपलब्धता, हंगाम सुरू होण्यास झालेला विलंब आणि साखर उताऱ्यात झालेली घट आदी कारणांमुळे देशाच्या साखर उत्पादनात १८ टक्क्यांनी घट झाली आहे. १५ मेअखेर देशाचे साखर एकूण साखर उत्पादन २५७.४० लाख टनांवर गेले असून, गतवर्षी ३१५.४० लाख टन साखर उत्पादन झाले होते. म्हणजेच साखर उत्पादनात ५८ लाख टनांनी घट झाली आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात १५ मेपर्यंत एकूण साखर उत्पादन १८ टक्क्यांनी कमी झाले आहे. २०२३-२४ मध्ये ३१५.४० लाख टन साखर उत्पादन झाले होते, त्या तुलनेत चालू हंगामात ५८ लाख टनांनी घट होऊन २५७.४० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. एकीकडे गाळपासाठी उसाची उपलब्धता घटली असतानाच दुसरीकडे सरासरी साखर उताऱ्यातही घट झाली आहे. गतवर्षीच्या १०.१० टक्क्यांवरून, चालू हंगामात ९.३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

अधिक वाचा  एरंडवण्यात दिवाळीनिमित्त आपुलकीचे नाते दृढ करणारा भाऊबीजेचा सण; चंद्रकांतदादांच महिला भगिनींतर्फे औक्षण

तुटवडा जाणवणार नाही

हंगामअखेर देशाचे साखरेचे उत्पादन २६१.१० लाख टन होण्याचा अंदाज आहे. निर्यात, घरगुती उपयोग आणि इथेनॉलसाठी वळविलेली साखर वगळून ४८ ते ५० लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साखरेचा तुटवडा जाणवणार नाही, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

ऊस गाळपही घटले

देशात यंदा ऊस गाळपही २७६७.७५ लाख टनांपर्यंत खाली आले आहे. गतवर्षी ३१२२.६१ लाख टन गाळप होते. गतवर्षाच्या तुलनेत ३५४.८६ लाख टनांनी घट झाली आहे. महाराष्ट्राचे उत्पादन यंदा ८०.९५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे, गतवर्षी ११०.२० लाख टन झाले होते, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले