पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अवलंबलेल्या विविध उपाययोजनांनंतर आता भारताने पाकिस्तानवर थेट हल्ला केला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून तेथील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही ट्विट करत या हल्ल्यांची कबुली दिली आहे. ‘भारताने पाकिस्तानमध्ये भ्याड हल्ला केला. आता याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार पाकिस्तानला आहे. देशातील संपूर्ण जनता पाकिस्तानी सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारताशी कसा सामना करायचा, हे पाकिस्तानी सैन्याला ठाऊक आहे’ असे शरीफ यांनी म्हटले आहे.






पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी ही कारवाई करण्यात आली. भारताने या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले आहे. मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास भारताने या कारवाईची माहिती जाहीर केली. त्यानंतर पाकिस्ताननेही अशी कारवाई झाल्याची कबुली दिली.













