शहरात सध्या १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून, त्यापैकी ९१ जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. तसेच आतापर्यंत तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती शहर पोलिस दलातील परकीय नागरिक विभागाने (एफआरओ) दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात. या नागरिकांमध्ये बहुसंख्येने दीर्घ मुदतीचा व्हिसा घेतलेले आहेत. हा व्हिसा पाच वर्षांसाठी वैध असतो, तर व्हिजिटर व्हिसा ९० दिवसांचा असतो.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, परराष्ट्र विभाग व संबंधित यंत्रणांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कोणताही परदेशी नागरिक भारतात आल्यावर संबंधित शहराच्या पोलिस आयुक्तालयात किंवा जिल्हा अधीक्षक कार्यालयात आपली नोंद अनिवार्यपणे करावी लागते. तसेच, एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करताना देखील नोंदवहीत बदल करणे आवश्यक असते. वेळोवेळी पोलिसांकडून त्यांच्या वास्तव्यासंबंधी तपासणीही केली जाते.
पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांची संख्या :
दीर्घ मुदतीच्या व्हिसा-
३५ पुरुष,
५६ महिला
व्हिजिटर व्हिसा
– २० नागरिक