मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० एप्रिलला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाला ताब्यात घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे. मुंबई हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाला ताब्यात घेतल्याबद्दल मी समाधानी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर कट रचणारा आता कोठडीत आहे आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) सक्रियपणे तपास करत आहे. हल्ल्याचा कट रचणाऱ्याला भारतीय न्यायव्यवस्थेला सामोरे जाण्यासाठी भारतात आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.






मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचे १० एप्रिलला भारतात यशस्वीरित्या प्रत्यार्पण झाले. त्याला विशेष विमानाने अमेरिकेतून भारतात आणले गेले. एनआयएने राणाला ताब्यात घेतल्याचा फोटो जाहीर केला आहे. गृहमंत्री अमित शहांनी हे पंतप्रधान मोदी सरकारच्या राजनैतिकतेचे मोठे यश असल्याचे नमूद केले होते. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधान मोदींचे याबद्दल आभार मानले आहेत.
शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी आणि कट रचणाऱ्यांपैकी एक तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आल्याने मला खूप आनंद झाला आहे. भारतीय न्यायव्यवस्थेला सामोरे जाण्यासाठी कट रचणाऱ्याला भारतात आणल्याबद्दल मी मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानतो. कायद्यानुसार कसाबला फाशी देण्यात आली हे आमच्यावर ओझे होते, परंतु कट रचणारा आमच्या ताब्यात नव्हता. तो आता एनआयएकडे आहे आणि ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आता, एनआयए तपास आणि कायदेशीर प्रक्रियांबद्दल विचार करेल.’ तसेच ‘आम्हाला जी काही माहिती हवी असेल ती आम्ही एनआयएकडून घेऊ आणि जर त्यांना काही मदत हवी असेल तर आम्ही ती मुंबई पोलिसांमार्फत करू,’ असेही मुख्यमंत्री तथा राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
२६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यात मुंबईतील अनेक इमारतींना तसेच गर्दीच्या स्थळांना लक्ष्य करण्यात आले होते. यात १६६ जणांचा मृत्यू आणि २३८ हून अधिक जण जखमी झाले होते, ज्यासाठी न्याय मिळवण्यासाठी व्यापक प्रयत्न केले गेले. १६ मे २०२३ ला कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्याच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली. तथापि, राणाने नवव्या सर्किटमध्ये अनेक कायदेशीरमार्गाने प्रयत्न केले आणि अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या, त्या सर्व फेटाळण्यात आल्या. अखेर तहव्वूर राणाला ताब्यात घेण्यात आले.











