राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून तब्बल 226 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.पण ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. मात्र याच दरम्यान आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्यासह सहकारात एकच खळबळ उडाली आहे. शेळके यांनी या निवडणुकीत 45 लाखांचा खर्च झाल्याचा दावा केला आहे.






संत तुकाराम सहकारी साखर कारखाना हा संस्थापक अध्यक्ष नानासाहेब ऊर्फ विदुरा नवले यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे. तर या कारखान्याला अजित पवार यांचे मार्गदर्शन असल्याचे बोलले जातेय. या कारखान्याची सध्या निवडणूक लागली असून 21 जागांसाठी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून सत्ताधारी मैदानात उतरले आहे. तर यातील 18 जागा या बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक सदस्य (६) मावळचे विद्यमान आमदार यांच्या सहकार्याने बिनविरोध झाल्याने नक्की आमदार सुनील शेळके यांचा खर्च कशासाठी झाला हा खरा मोठा प्रश्न आहे.
पण आता या 18 जागावरूनच रणकंदण सुरू झाले असून बिनविरोध झालेल्या संचालकांच्या सत्कार कार्यक्रमातच आमदार सुनील शेळके यांनी मोठा दावा केला. यावेळी शेळके यांनी, आपण बिनविरोध झालेल्या संचालकांचा सत्कार करत आहोत. पण याच संचलाकांच्या घरावर मोर्चा न्यायलाही कमी पडणार नसल्याचे सांगितल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
तसेच शेळके यांनी, बिना पैशाचे हे लोक संचालक झालेत. फक्त अर्ज भरला आणि संचालक झालेत. पण या संचालक निवडणुकीत माझे 45 लाख रुपये गेलेत. त्यामुळे मी यांना सोडणार नाही असे म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे. तर सहकारात संचालक मंडळांना बिनविरोध करण्याकरिता किंवा माघार घेण्यासाठी पैशाचा व्यवहार करावा लागतो. तो येथे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ही झाल्याची जाहीर कबुलीच आमदार सुनील शेळके यांनी दिल्याचे बोलले जातेय.
दरम्यान गेल्या आठवड्यात कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 226 अर्ज दाखल झाले होते. ज्यातील 5 वाद झाले होते. तर 26 उमेदवारांनी दुबार अर्ज भरल्याने ते बाजूला काढण्यात आले होते. तर छाननी अंती 195 उमेदवार पात्र झाले होते.











