पानी फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील कार्यक्रमाला रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमादरम्यान माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येक शेतकरी गटाला आणि प्रत्येक गावातील शेतकऱ्यांसाठी एक ड्रोन राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत देणार असल्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा करताना माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसमोर एक अट ठेवली आहे.






पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, ”पानी फाउंडेशनच्या माध्यमातून जे काम अभिनेते आमिर खान करत आहेत. ते त्यांना जमतं कारण त्यांना कोणतीही निवडणूक लढवायची गरज नसते ते राजकारणी नाहीत म्हणून हे सगळ त्यांना जमतं कारण त्यांनी काम सुरू केल्यानंतर गावांत गटतट निर्माण होत नाहीत. सर्वजण एकत्र येऊन काम करतात.”
तसेच ”पानी फाउंडेशने गटशेतीची जी संकल्पना समोर आणली आहे ती अतिशय चांगली आहे. या गटशेतीमुळे अनेक शेतकरी एकत्र येऊन त्यांचा विकास साधणार आहेत. याचा उपयोग निश्चितच शेती उत्पन्न वाढवण्यासाठी होणार आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये या उपक्रमामुळे एक मोठी क्रांती घडेल अशी अपेक्षा आहे.” असंही कोकाटे म्हणाले.
याचबरोबर ”शेती गटांना आणि प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्याच्या कृषी खात्याच्या वतीने मी एक ड्रोन फ्री दिला जाईल असा शब्द देतो. 100 टक्के ड्रोन दिला जाईल मात्र त्यासाठी एक अट ठेवली जाईल. की कुणीही रसायनिक फवारणी पिकांवर करायची नाही. जास्तीत जास्त नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल असला पाहिजे. असं राज्य सरकारचे धोरण आहे.” असं कोकाटे यांनी सांगितलं.
याशिवाय ”कृषी विभागाला दरवर्षी 5000 कोटी रुपयांची तरतूद केली गेली तर आपण शेती क्षेत्रात अनेक उपक्रम राबवू शकतो आणि क्रांती घडवू शकतो, अस सांगितल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला तत्वतः मान्यता देखील दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषी खात्याच्या कुठल्याच योजनांना नाही म्हणत नाहीत. सगळ्या योजनांना ते होकार देत असतात.” असं माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं.
तर, ”उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो की कृषी खाते माझ्याकडे दिले, कारण शेती मला आधीपासून माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील हा शब्द देतो. शेतकऱ्यांना माझं आवाहन आहे की कोणीही खचून जाऊ नका, चिंता करू नका प्रामाणिकपणे कर्तृत्व दाखवा म्हणजे यश निश्चित आहे. ” असं कोकाटे म्हणाले.











