टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 49 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्मा याने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. रोहितने सर्वाधिक 76 धावांची स्फोटक खेळी केली. तसेच रोहितने शुबमन गिल याच्यासह 105 धावांची सलामी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. रोहितने स्फोटक सुरुवात करुन दिली. त्यामुळे टीम इंडिया पावरप्लेमध्ये न्यूझीलंडवर वरचढ राहिली. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने पराभवानंतर पावर प्लेचा मुद्दा धरुन प्रतिक्रिया दिली. तसेच रोहितच्या खेळीचाही उल्लेख केला.






रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी 116 बॉलमध्ये 105 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर शुबमन गिल 31 धावांवर आऊट झाला. तसेच त्यानंतर टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्या. विराट कोहली 1 धाव करुन आऊट झाला. तर त्यानंतर रोहित आऊट झाला. रोहितने 76 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 फोरसह 76 रन्स केल्या.
मिचेल सँटनर काय म्हणाला?
“बॅटिंग करण्यासाठी पावरप्ले सर्वात चांगली वेळ होती. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी पावर प्लेचा पूर्ण फायदा घेतला. रोहितची खेळी शानदार होती. रोहितच्या खेळीमुळे आम्ही बॅकफुटवर गेलो. मात्र खेळ कधीही बदलू शकतो, हे आम्हाला माहित होतो. त्यामुळे आम्ही विकेट्स घेत राहिलो आणि सामन्यात कायम राहिलो”, असं सँटनरने म्हटलं.
रोहित शर्मा ‘मॅन ऑफ द मॅच’
दरम्यान रोहित शर्मा महाअंतिम सामन्यात सामनावीर ठरला. रोहितने केलेल्या वादळी खेळीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रोहितची आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळण्याची सातवी वेळ होती. मात्र रोहितला याआधी एकदाही अंतिम सामन्यात अर्धशतकही करता आलं नव्हतं. मात्र यंदा रोहितने अर्धशतक करत इतिहास बदलला.











