मुंबईत झालेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक निकालावर आपले मत मांडले. यावेळी राज ठाकरे यांनी या निकालावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. ‘बाळासाहेब थोरांतांच्या पराभवावर विश्वास बसत नाहिये. लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार जिंकले. त्या खासदारांच्या खाली ४ ते ५ आमदार असतात. त्यांचे १५ आमदार आले? शरद पवार यांचे ८ खासदार आहेत त्यांचे इतके कमी आमदार?’, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘४ महिन्यात लोकांच्या मनात इतका फरक पडला का? काय झालं? कसं झालं? काही कळत नाही.’ असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.






राज ठाकरे यांनी वरळीमध्ये होत असलेल्या मनसेच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना विधानसभा निवडणूक निकालावर २ महिन्यांनंतर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी आतापर्यंत या निकालावर बोलणं टाळलं होतं. पण त्या त्यांनी या निकालावर अनेक प्रश्न उपस्थित करत आपले मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, ‘मागील दोन महिन्यांत बरेच लोक मला भेटायला आले. विधानसभा निकालानंतरच्या गोष्टीचे आकलन सुरू आहे. शांत आहे. याचा अर्थ विचार करत नाही असा होत नाही.’, असे राज ठाकरे म्हणाले.
‘निकालानंतर राज्यात सन्नाटा. लोकांनाही या निकालाचे आश्चर्य वाटलं. मिरवणुका निघाल्या नाहीत. लोकांमध्ये संभ्रम होता, असं कसं झालं. माझ्याकडे एक संघाचा माणूस आला होता. तो म्हणाला इतना सन्नाटा क्यू है भाय? अरे कोणी तरी जिंकलं असेल ना, सन्नाटा पसरला हे कसलं द्योतक आहे.’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
मनसेचे नेते राजू पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला यावर देखील राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत निकालावर शंका व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘ राजू पाटलांचे १४०० लोकांचं गाव. पण त्या गावातानू त्यांना एकही मत नाही मिळालं. आधी १४०० सगळी मतं पडायची. आता एक पण मत पडलं नाही.’, असे म्हणत राज ठाकरेंनी विधानसभा निकालावर शंका उपस्थित केली.
‘शरद पवार यांचे ८ खासदार निवडून आले होते. त्यांचे १० आमदार कसे निवडणूक येऊ शकतात. अजित पवार यांचा १ खासदार निवडून आला. अजित पवार यांचे चार-पाच आमदार निवडणूक येतील असे वाटले होते. त्यांचे ४२ निवडून आले. चार महिन्यांमध्ये लोकांच्या मनात इतका कसा फरक पडला. जिंकून आलेले रोज रात्री बायकोला सांगतात चिमटा काढा. बाळासाहेब थोरात ७ वेळा आमदार म्हणून जिंकून आले. ६० -७० हजार मातांनी निवडून यायचे, त्या बाळासाहेब थोरात यांचा १० हजार मातांनी पराभव होतो?’, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
तसंच, ‘ते म्हणतील राज ठाकरे यांचा पराभव झाला म्हणून ते बोलतात. पण हेमी नाही बोलत तर जनता बोलतेय.’, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ‘या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं पण ते आपल्याकडे आलेलं नाही. लोकांनी आपल्याला मतदान केलं. पण ते गायब झालं.’ असे राज ठाकरे म्हणाले













