सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, ‘हा’ बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर

0
1

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सत्ता आल्यापासून पुन्हा एकदा पक्षांतराच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मविआच्या गोटातील अनेक लहान-मोठे नेते वाहत्या वाऱ्याची दिशा पाहून सत्ताधारी महायुतीच्या गोटात दाखल होऊ लागले आहेत. अशातच आता शिंदे गटाकडून सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला सुरुंग लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रमेश बारसकर हे दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे. रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक, दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची माहिती. रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते. मात्र, लवकरच ते आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सक्रिय झाला आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मविआतील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे. पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेने सोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे.

धाराशिव जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याचे संकेत

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त धाराशिवमध्ये आले होते. यावेळी त्यांनी धाराशिवमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याचे संकेत दिले होते. भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढे पुढे काय होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत या राज्यातील जननेते दाखवून दिलं आहे की, खरी शिवसेना कोणाची आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात बदल झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे