स्वत:चं पिंडदान केल्यानंतर ममता कुलकर्णीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली “हा महादेवांचा आदेश..”

0
1

एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णीने आता तिचा अध्यात्मिक प्रवास सुरू केला आहे. तब्बल 25 वर्षांनंतर ती भारतात परतली. महाकुंभ 2025 मध्ये ममताने संन्यास घेतला आणि किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. महामंडलेश्वर बनण्याआधी तिने स्वत:चं पिंडदान केलं. शुक्रवारी प्रयागराजमधील संघम घाटवर ममताने पिंडदानाची विधी पूर्ण केली. यानंतर ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला तिने पहिली प्रतिक्रिया दिली. “हा महादेव आणि महाकाली यांचा आदेश होता. माझ्या गुरूंनी मला हा दिलेला आदेश होता. त्यांनीच आजचा दिवस निवडला. यात मी काहीच केलं नाही”, असं ती म्हणाली. यानंतर शुक्रवारी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांनी घोषणा केली की ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर म्हणून अध्यात्मिक भूमिका स्वीकारली आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

“किन्नर आखाडा ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर बनवणार आहे. त्यांना श्री यमाई ममता नंदगिरी असं नाव देण्यात आलं आहे. मी तुमच्याशी इथे बोलत असताना तिथे सर्व विधी पार पडत आहेत. गेल्या दीड वर्षापासून ममता या किन्नर आखाडा आणि माझ्या संपर्कात आहेत. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार भक्ती करण्याची परवानगी आहे. कारण आम्ही कोणालाही त्यांची कला सादर करण्यापासून मनाई करत नाही”, असं लक्ष्मी नारायण म्हणाल्या.

नव्वदच्या दशकात ‘करण अर्जुन’ आणि ‘बाजी’ यांसारख्या चित्रपटांमधून ममता लोकप्रिय झाली. तिने शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान अशा मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलंय. मात्र 2000 च्या सुरुवातीला ती बॉलिवूडपासून दूर गेली परदेशात स्थायिक झाली. ममता तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत होती. तिने विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केल्याचं म्हटलं जातं. परंतु, ममताने याचा कधी उल्लेख केला नाही आणि नेहमीच ती केवळ एक अफवा असल्याचं म्हटलं गेलं. असं म्हणतात की ममता विकीसोबत 10 वर्षे दुबईत राहत होती. त्याचबरोबर असंही म्हटलं जात होतं की, तिने तिच्या पतीसह मिळून अनेक बेकायदेशीर कामंही केली.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

“माझं ड्रग्ज विश्वाशी काहीच कनेक्शन नाही कारण मी त्या लोकांना कधी भेटलेच नाही. होय, विकी गोस्वामीशी माझा संपर्क झाला होता. 1996 मध्ये माझा अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि त्यादरम्यान माझ्या आयुष्यात एक गुरू आले,” असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.