नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांनी भाजपवर थेट जाळे टाकले आहे. दुसरीकडे स्थानिक पातळीवर शिवसेना चांगलीच आक्रमक बनली आहे. या राजकीय वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तोडगा काढणार याला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. या आधी राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्ती लांबणीवर पडल्या होत्या. या नियुक्त्या जाहीर होताच त्यावरून महायुतीतच आदळ आपट झाली. चोवीस तासांतच नाशिक आणि रायगडच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या नियुक्ती कारखडल्या याचाही बोध होतो.
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे गिरीश महाजन सुरुवातीपासून प्रचंड आग्रही होते. त्याला मुख्य कारण आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि त्या निमित्ताने होणारी हजारो कोटींची कामे हे एक कारण असावे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि आमदार देखील त्याबाबत कॉन्फिडंट होते.
मात्र मंत्री महाजन यांसह भाजपचा हा आत्मविश्वास शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी क्षणात जमिनीवर आणला आहे. भाजप आता बराच डिफेन्सिव्ह मूडमध्ये आला आहे. त्यामागे दादा भुसे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कॅल्क्युलेटीव्ह राजकारण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून परतल्यावर याबाबतचा निर्णय होणार आहे.
या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि नेते यांच्यामध्ये एकमत दिसून येते. त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. या संदर्भात विविध पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. ही भेट झाली नाही. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानासमोरच निदर्शने देखील करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. मात्र एकालाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. अशा स्थितीत दुधाची तहान ताकावर या न्यायाने भाजपला पालकमंत्री पद हवे आहे. त्यांची ही तहानही भागणार की नाही, अशी अनिश्चितता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षाने करून ठेवली आहे. आता या निमित्ताने पालकमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपवर जाळे टाकले आहे. हे जाळे कुरतडून भाजप आपला हेतू साध्य करतो की शिंदेंपुढे नमते घेतो याचीच आता स्थानिक कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.