‘निर्णय घेतला आहे, योग्य वेळ आल्यावर…’ भुजबळांचा सूचक इशारा; म्हणाले….. नाराज असल्याचे सांगत बसणार नाही

0

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला बहुमत मिळाले त्यानंतर सरकारही स्थापन झाले. मात्र, महायुतीमधील तीन घटक पक्षात सरकार स्थापनेपासून या ना त्या कारणावरून नाराजी दिसत आहे. ही नाराजी लपून राहिली नसल्याने सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक नेते नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील नाराज आहेत. त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही दहा ते 15 दिवस परदेश दौऱ्यावर जाऊन आल्यानंतरही ते नाराज असल्याचे दिसत आहे.

त्यातच भुजबळ यांनी शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला. तर चाकणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि भुजबळ हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले. यावेळी या दोन नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी मी नाराज असल्याचे सांगत बसणार नाही तर ‘मी निर्णय घेतला आहे, योग्य वेळ आल्यावर सांगणार’ असल्याचे स्पष्ट करीत सूचक इशारा दिला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर आले होते. त्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. मी जो काही निर्णय घेतला असेल तो मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. मी दररोज नाराज आहे असे सांगत बसणार नाही. मला काय घाई नाही, मी निर्णय घेतला आहे, माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर सांगेन, असे भुजबळ म्हणाले.

दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे, त्यानंतर आता विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत भुजबळांना विचारले असता त्यांनी यावर फार बोलणं टाळले. मला काही कल्पना नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते पाहातील.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

दरम्यान, शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावर आले होते. यावर देखील भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी मला बोलावले आहे. पवार साहेब देखील त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून होते, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.