परभणी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद; शिवडी विभागात संमिश्र प्रतिसाद

0

शिवडी दि. १६ (रामदास धो. गमरे) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रजासत्ताक भारत देशाला दिलेल्या संविधानाची भारत देशातच विटंबना, मोडतोड होते हे खरे तर या अखिल भारत देशाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. परंतु मनुवादी पुरस्कृत अदृश्य महाशक्तीच्या पाठिंब्याने परभणीमधील कोण्या तथाकथित माथेफिरूने संविधान प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना केली त्या घटनेच्या निषेधार्थ परभणी येथे मोर्चा निघाला. व त्यातून जी दंगल उसळली त्यात अनेक भीमसैनिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबून मारहाण करण्यात आली त्या अमानुष मारहाणीचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचाही पोलिसांद्वारे झालेल्या अमानुष मारहाणीत बळी गेला, दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचे शिक्षण घेणारा युवक होता.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

परभणी घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्च्यात सहभागी भीमसैनिकांना पोलीस नियमांचे उल्लंघन करून कशाप्रकारे बेदम मारहाण करतात याचा व्हीडिओ त्याने बनवला होता, म्हणून पोलिसांनी अचानक त्याच्या घरी धाड टाकून तो जेवण करत असतानाच त्याला घरातून उचलून नेले. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ही न्यायालयीन कोठडीतून त्याची सुटका झाली नाही व कोठडीतच पोलिसांनी केलेल्या अमानुष बेदम मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुण भीमसैनिकाचा दुर्दैवी अंत झाला या संदर्भात सरसेनानी आनंदराज आंबेडकर व संविधानरक्षक अनेक संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या अनुषंगाने शिवडी विभागातील बौद्धजन पंचायत समिती गटक्रमांक १३, रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर संघटनांनी या बंदमध्ये उतरून बंदला उस्फुर्त प्रतिसाद दिला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, विभागीय कोषाध्यक्ष प्रविण तांबे, राजाभाऊ शेळके, निवडणूक मंडळाचे सदस्य अशोक कदम, रिपब्लिकन सेनेचे अविनाश मोहिते, अंकुश व रिपब्लिकन सेनेचे इतर कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनातील दुःख व प्रक्षोभ व्यक्त करणारे निवेदन शिवडी विभागातील किडवाई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रणदिवे साहेब यांना सादर करून सदर भावना सरकारपर्यंत पोहचवा अशी त्यांना विनंती केली.