मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकमेकांवर सातत्याने टीका करणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली असावी, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. एवढेच नाही तर ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतल्याने त्यात आणखी भर पडली. त्यावर आता आमदार आदित्य ठाकरेंनी आपण एक पाऊल पुढे टाकल्याचे विधान केले आहे.






फडणवीसांना भेटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या भेटीत त्यांनी शुभेच्छा दिल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, भास्कर जाधव, अनिल परब हे नेतेही उपस्थित होते. याविषयी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी आपण एक पाऊल पुढे टाकल्याचे सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले, आमच्या पक्षप्रमुखांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्रासाठी काम करताना दोघांनी राजकीय प्रगल्भता दाखवायला हवी. महाराष्ट्र, देशाच्या हितासाठी असलेल्या गोष्टींवर सोबत काम करावे, ही अपेक्षा आहे.
आम्ही विरोधी पक्षात आणि ते सत्तेत असलेले तरी आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. एकत्रितपणे काम करताना त्यांनी आमच्या सुचना ऐकून त्यातून चांगले व्हावे, असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले. ईव्हीएम आणि विरोधी राजकीय विचारधारेवर राजकीय चर्चा होतच राहतील, पण त्यातील काही चांगले व्हावे, ही अपेक्षा असल्याचेही ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्दावर आदित्य ठाकरेंनी बोलणे टाळले. याबाबत त्यांना विचारले असताना त्यांनी महाराष्ट्र हिताची गोष्ट व्हावी, असे सांगत बोलणे थांबवले. विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही, कुणाला मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. विरोधकांकडून या पदासाठी पुरेसे आमदार नसल्याचे सत्ताधारी नेत्यांकडून सांगितले जात आहे. तर नार्वेकरांनी नियमानुसार सर्वकाही होईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे विरोधी पक्षनेते असणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे.











