राज्यात विधानसभेची निवडणूक होतेय. काल प्रचार संपला आहे. उद्या मतदान होणार आहे. असं असतानाच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विवांता हॉटेलमध्ये घेरलं आहे. यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही गटात तुफान राडा सुरु आहे. जोवर विनोद तावडे हॉटेलच्या खाली येऊन लोकांशी बोलणार नाहीत, तोवर इथून हटणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.






त्या डायरीत नेमकं काय?
विनोद तावडे आणि त्यांचे कार्यकर्ते विरार पूर्व मनवेलपाडामधील विवांता हॉटेलमध्ये बसले होते. तेव्हा क्षितीज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. काळ्या रंगाच्या बॅगमधून डायरी बाहेर काढत क्षितीज ठाकूर यांनी जाब विचारला.
माफ करा मला जाऊ द्या, अशी विनंती करणारे फोन विनोद तावडे करत आहेत. 25 फोन विनोद तावडे यांनी केले आहेत, असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.











