काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला…

0
1

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी महायुतीच्या मनमानी कारभारावर महाविकास आघाडीने हल्लाबोल केला आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल झाल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी शहरी नक्षलवाद्यांचा पाठिंबा घेण्यासाठी ‘लाल संविधान’चा उपयोग केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “फडणवीस ज्या पुस्तकावर आक्षेप घेत आहेत ते हिंदुस्थानचे संविधान आहे. ज्याचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे तेच संविधान आहे जे मनुस्मृतीला प्रेरित नसल्याचे सांगून नोव्हेंबर 1949 मध्ये RSS ने टीका केली होती. हे हिंदुस्थानचे तेच संविधान आहे, ज्याला नॉन-बायोलॉजिकल प्रधानमंत्री बदलू पाहत आहेत.” असे म्हणत जयराम रमेश यांनी फडणवीस यांच्यासह प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्यावर निशाणा साधला.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

“जोपर्यंत शहरी नक्षलवादाचा संबंध आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाने 11 मार्च 2020 आणि 9 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत सांगितले आहे की, हिंदुस्थान सरकार हा शब्द वापरत नाही. त्यामुळे फडणवीसांनी आधी विचार करावा आणि मग बोलावे”, असे म्हणत जयराम रमेश यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले आहेत.

काँग्रेसच्या डी.के. शिवकुमारांचं मराठीत ट्विट, भाजपच्या प्रचाराला प्रत्युत्तर

काँग्रेस सरकारने देशातील विविध राज्यांमध्ये निवडणुकीपूर्वी घोषणा केलेल्या योजना एक-एक करुन बंद झाल्याचा प्रचार सध्या महायुतीकडून केला जात आहे. त्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेसच्या राजवटीतील योजनांचा संदर्भ दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी मराठीत ट्विट करुन भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

कर्नाटक हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श राज्य आहे, कारण इथे केंद्र सरकारच्या महागाईमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही खात्रीशीर योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या जनतेची फसवणूक करत, आमच्या हमी असलेल्या योजनांची नक्कल करण्यापर्यंत ते गेले आहेत. ही बसवण्णांची भूमी आहे, आम्ही आमच्या जनतेला दिलेले वचन पाळले आहे. याबाबत कोणालाही शंका असेल, तर मी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी विशेष विमान किंवा बसेसची व्यवस्था करीन, जेणेकरून ते कर्नाटकात येऊन आमच्या लोकांशी संवाद साधू शकतील आणि सत्य जाणून घेऊ शकतील!

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

आमच्या 1.22 कोटी महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा 2000 रुपये मिळत आहेत. 1.64 कोटी कुटुंब ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत आहेत. 4.08 कोटी लोकांना ‘अन्नभाग्य’ योजनेअंतर्गत मोफत तांदूळ दिले जात आहे. ‘शक्ती’ योजनेद्वारे 320 कोटी महिलांनी मोफत प्रवास केला आहे. ‘युवा निधी’ योजनेद्वारे 5 लाख विद्यार्थ्यांना महिन्याला 3000 रुपये मिळत आहेत.

दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, अशी माझी मागणी आहे. अन्यथा, आम्हाला कायदेशीर कारवाईचा विचार करावा लागेल.