मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आलेली आहे. वयाच्या 57 व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. नाटक,सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती.






मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. इतकच नव्हे तर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. त्यांच्या या नव्या अंकाचं अनेकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. इतकच नव्हे तर त्यांनी नुकतच सुर्याची पिल्ले या नाटकाचीही घोषणा केली होती. त्यामुळे अतुल परचुरे हे रंगभूमीवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासही सज्ज झाले होते.
जयवंत वाडकर यांना अश्रू अनावर
अभिनेते जयवंत वाडकर यांना ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी म्हटलं की,सूर्याची पिल्ले नाटाकाची तालीम सुरु होती.. पाच दिवसांपूर्वी त्याला पुन्हा त्रास होत होता म्हणून अॅडमिट करण्यात आलं. पण तो पुन्हा येईल असं वाटलं होतं. यावर काय बोलावं हेच सुचत नाहीये. नववीत असल्यापासून आम्ही एकत्र काम करतोय. तेव्हापासूनची आमची मैत्री होती. आमचा मित्र खूप लवकर गेलाय.
ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही : अशोक सराफ
ही अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. मराठी सिनेसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. एक चांगला अभिनेता मराठी सिनेसृष्टीने गमावला आहे. ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही. असं व्हायला नको होतं. फार छान नट, फार छान मुलगा होता. माझा अत्यंत जवळचा आणि आवडता मित्र होता. एका सिनेमात त्याने माझं लहानपण केलं होतं आणि हे मी विसरुच शकत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी एबीपी माझाला दिली आहे.
अतुल परचुरे हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंजत होते. पण या सगळ्यावर मात करत पुन्हा एकदा रंगभूमीवर एक दमदार प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी सुर्याची पिल्ले या नाटकाची निवडही केली होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. पण आता अतुल परचुरे यांनी जगाचा निरोप घेतला असून एक हरहुन्नरी कलाकार मराठी सिनेसृष्टीने गमावला असल्याची भावना प्रत्येकाची आहे.











