कोल्हापूरमध्ये एका 20 वर्षाच्या तरुणाची भर दिवसा हत्या झाल्याची घटना घडली आहे. आरोपींनी धारदार शस्त्रांनी तरुणाची हत्या केली आहे. या हत्येमुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही आज (13 जून) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आरोपींनी तलवारीने मृतकावर हल्ला केला. मग आरोपींकडे तलवार नेमकी आली कुठून? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात सुधाकर जोशी नगरात टोळी युद्धातून आज दुपारी एक वाजेच्या सुमारास तलवार आणि एडक्याचे सपासप वार करून सुजल बाबासो कांबळे (वय २०, वारे वाहतात) याचा आठ ते दहा जणांनी खून केला. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे आणि त्याचे मित्र आज दुपारी गप्पा मारत बसले होते. यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलच्या पाठीत, पोटावर आणि हातावर गंभीर वार केले. सुजल आणि त्याच्या मित्रांचा सोशल मीडियावरील पोस्टवरून 8 ते 10 दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता. या वादातूनच सुजलचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.