‘2022 ला बांबू लावले नसते तर इथे दिसलो नसतो’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

0

एकनाथ शिंदे हे दरवर्षी त्यांच्या दरेगावात जावून शेती करतात. एकनाथ शिंदे शेती करण्यासाठी गावी जातात म्हणून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जाते. पण एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यामुळे राज्यात सत्तांतर घडून आलं. याबाबतही एकनाथ शिंदे यांनी मिश्किल शब्दांत ठाकरे गटाला टोला लगावला आहे. “2022 ला बांबू लावले नसते तर इथे दिसलो नसतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. “मी गावी जातो. शेती करतो. मात्र लोक म्हणतात की, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात. मात्र मी मुख्यमंत्री असल्याने माझा एक-एक मिनिट महत्त्वाचा आहे. यासाठी गाडीने गेलो तर दहा तास लागतील. एवढ्या वेळात मी 1000 फाईल साइन करतो. त्यामुळे मी कोणाकडे लक्ष देत नाही. मी माझं काम करतो”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

अधिक वाचा  मराठा विद्यार्थ्यांना ‘ओबीसी’प्रमाणे सवलती मिळणार; राज्य सरकारचा निर्णय; जीआरही निघाला

“महाराष्ट्रात 2022 ला बांबू लावलेले. जेव्हा गरज पडली तेव्हा बांबू लावा लागतो. ही मस्करी यासाठी सुरू आहे कारण आमदार गुवाहाटीला आमच्यासोबत होते. त्यावेळेला भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळेला आम्ही बांबू लावले नसते तर आज आमची बैठकी या ठिकाणी होत नसती”, असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

“महाराष्ट्रामध्ये सगळेच कामे बंद होती. एक विचारधारेचं सरकार नव्हतं. दुसरं सरकार होतं. तेव्हा आम्ही विचार करत होतो. दोन वर्ष कोरोना संकट काळात वाट पहावी लागली. 2022 ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आलं. शिवसेना, भाजप, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आलं. बंद झालेले सगळे प्रोजेक्ट पुन्हा सुरू झाले”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

अधिक वाचा  पुढील 24 तासांत ‘या’ राज्यांत धडकणार मान्सून; महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज उकाड्यापासून मिळणार सुटका! 

‘आम्हाला कांद्याने रडवलं’
एकनाथ शिंदे यांनी यावेळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेल्या पराभवावरही प्रतिक्रिया दिली. “कांद्यामुळे निवडणुकीमध्ये आम्हाला कांद्याने रडवलं. मराठवाड्यात सोयाबीन आणि कापूसमुळे आम्हाला त्रास झाला”, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी कबूल केलं. “नरेंद्र मोदी यांनी साठ वर्षात जी कामे झाली नाही ती कामे करून दाखवली. मात्र काही लोकांनी निगेटिव्हिटी पसरवली. त्यामुळे आम्हाला नुकसान झालं. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं”, असं एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं.

“विरोधकांनी संविधान बदलणार असा प्रचार केवळ एनडीए 400 पुढे जाईल यासाठी केला. पण एकही दिवस सुट्टी न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. देशाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान असावं असं वाटतं”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

अधिक वाचा  राज्यात केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी? एवढ्या अटी शर्ती लादल्याने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण