लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याअगोदरच महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीत फूट पडली आहे का? अशा चर्चा सध्या राज्यात सुरू झालेले आहेत कारण विविध राजकीय अंदाजामध्ये अजित पवार यांना मिळणाऱ्या जागा आणि पदवीधर मतदारसंघात सर्वात अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेली उमेदवारी या सर्व गोष्टींवरून लोकसभा निकालाच्या अगोदरच काहीतरी बिघडलेय अशी इच्छा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत अनेक मोठे भाकीतं केली आहेत. केंद्रात कुणाचं सरकार बनेल? तसेच लोकसभेत महाविकास आघाडी की महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील? याबाबत अनेक भाकीतं वर्तवली आहे.






लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला. राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी काही ठिकाणी सभादेखील घेतल्या. पण लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडतील. फक्त राज ठाकरे हेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील महायुतीतून बाहेर पडणार, असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे.
एनडीएला किती जागा मिळणार?
“लोकसभा निवडणुकीत एनडीएला 325 ते 350 जागा मिळतील. महाराष्ट्रात महायुतीला 37 ते 40 जागा मिळतील. उर्वरित जागा महाविकास आघाडीला जातील”, असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं. “मोदींना दोन तृतीयांश बहुमत मिळेल. 2029 ला ही उमेदवार पुन्हा तेच असतील, असेही वाटते. 75 वय वगैरे सगळे इतरांकरता आहे. त्यांच्यासाठी नाही. 407 जागा मिळवण्यासाठी ते इतर पक्ष ही फोडू शकतात. देश हुकूमशाहीकडे जाईल असं मला वाटत नाही”, असं अनिल थत्ते म्हणाले. “अजित दादांना एकही सीट मिळणार नाही”, असा देखील दावा अनिल थत्ते यांनी केला.
‘ठाकरे-पवारांच्या पाठीमागे सहानुभूती’
“श्रीराम मंदिराचा मुद्दा देखील मला वाटत होतं की इलेक्शन होईपर्यंत वातावरण चैतन्यमय ठेवेल. मात्र हा मुद्दा कुठेतरी विरला. सहानुभूती नक्की मिळाली. अजित पवारांना शरद पवारांनी सगळं दिलं. मात्र असं असताना देखील अजित पवारांनी शरद पवार यांना धक्का दिला. वडिलधाऱ्या माणसांना त्यांनी या वयात छळलं. तर बाळासाहेबांचा वारसा हा उद्धव ठाकरेंकडेच आहे. त्यांना धक्का देणे हे देखील अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे सहानभूती त्यांच्याबद्दल देखील आहे”, असा दावा अनिल थत्ते यांनी केला.
“वंचित आघाडीची क्रेडीबिलिटी घालवण्याचे काम प्रकाश आंबेडकरांनी केलं. त्यांनी पहिल्यापासून कोलांटी उड्या मारण्याचे काम केलं. पहिल्यापासूनच ते आघाडीमध्ये जाण्यासाठी उत्सुक नव्हते. केवळ त्यांनी बहाणे शोधले”, असं वक्तव्य अनिल थत्ते यांनी केलं.
“राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडतील. अजितदादाही महायुतीतून बाहेर पडतील. राज ठाकरे यांचं आत्तापर्यंत कोणाशी पटले नाही. त्यामुळे आताही यांच्याशी पटणार नाही. ठाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील राज ठाकरेंनी अभिजीत पानसेंना उभं केलं आहे. दोघेही माघार घेणार नाहीत. तिथेच महायुतीत फूट पडली आहे. लोकसभेसाठी मनसे महायुतीत राहील. त्यानंतर ते महायुतीत राहणार नाहीत”, अशी भविष्यवाणी अनिल थत्ते यांनी वर्तवली आहे.












