मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार कमलनाथ सध्या चर्चेत आहे. मध्य प्रदेशमधील निवडणुकीत काँग्रेस चमकदार कामगिरी करू न शकल्याने त्यांना साई़डट्रॅक केल्याची चर्चा होती. आणि तेव्हापासून ते नाराज असल्याचीही चर्चा आहे. आता त्यात आणखीही एका चर्चेची भर पडली आहे. ती कमलनाथ यांच्या राजकीय अस्तित्वाची.
काही दिवसांपासून कमलनाथ काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून कमलनाथ नक्की काय करणार आहेत, यावरून चर्चांना उधाण आले आहे. त्यावर कमलनाथ यांनी अतिशय सूचक उत्तर दिले आहे.
कमलनाथ छिंदवाडाचे खासदार आहेत आणि नऊ वेळी ते या मतदारसंघातून संसदेत गेले आहेत. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश न मिळाल्याने पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यावरून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी त्यांचे सहकारी आचार्य प्रमोद क्रिश्नम भाजपमध्ये जात असल्याची चर्चा सुरू झाली. नेमके याचबाबत त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी दिलेले उत्तर गोंधळात आणखी भर टाकणारे आहे.
कमलनाथ म्हणाले, राजकीय नेते मुक्त असतात. त्यांना कुणीही पक्षाच्या दावणीला बांधू शकत नाही. झालं असं की, क्रिश्नम यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना उत्तर प्रदेशमधील श्री काल्की धामच्या पायाभरणीसाठी निमंत्रण दिले. हा कार्यक्रम 19 फेब्रुवारीला होणार आहे. विशेष म्हणजे याच क्रिश्नम यांनी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काँग्रेसने न जाण्याच्या निर्णयावर टीका केली होती.