राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना जनहिताचे निर्णय घेण्याऐवजी तत्कालीन राजकारण्यांनी स्वतःचे अस्तित्व अबाधित ठेवण्यावर भर दिला. अडीच वर्षांच्या कार्यकाळात राज्य सरकारने जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाहीत, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यांनी केला. फडणवीस- शिंदे सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला असून, समाज बांधवांनी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी फडणवीस यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता.१४) जिंतूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर, सुरेश भुमरे, लक्ष्मण बुधवंत, सुरेश भुमरे, डॉ. पंडित दराडे, प्रा. प्रभाकर वजीर, सुधाकर कुकडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आमदार पडळकर म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये धनगर समाजासाठी एकही समाजोपयोगी काम केले नाही अथवा अहिल्यादेवी होळकरांचा सन्मान होईल, असे एकही काम केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच धनगर समाजाचा अपमान केला. शिंदे- फडणवीस यांचे सरकार राज्यात सत्तेवर येताच त्यांनी समाजाच्या हिताचे निर्णय घेत बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव दिले.’’
आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या, ‘‘मी व्यक्तीशः पुढाकार घेऊन मतदारसंघातील जिंतूर व सेलू तालुक्यातील ६९४ गरजूंना घरकुलाचा लाभ मिळवून दिला. शिवाय मतदारसंघातील अनेक विविध विकासकामे मार्गी लावली. तसेच समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत अनेक गरजूंना शासन योजनांचा लाभ मिळवून दिला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रम घेतले.’’ कार्यक्रमास शहरासह मतदारसंघातील धनगर समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती.