हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात परिसरात दगडफेक केल्यामुळं पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. सोशल मीडियातील आक्षेपार्ह स्टेटस् आणि मेसेज प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज, बुधवारी (ता. ७) कोल्हापूर शहर बंदची हाक दिली आहे.
आज सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकानं बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. आक्षेपार्ह स्टेटस् ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, गंजी गल्ली आणि बिंदू चौकात काही घरांवर दगडफेड झाल्यामुळं पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे. शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बोलवलं आहे.