मुंबई :– शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शुक्रवारी ऑन कॅमेरा थुंकले होते. त्यांच्या कृतीचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिली आहे. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. आज संजय राऊत त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर असून त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे, असे अजित पवार यांनी संजय राऊतांच्या कृतीवर प्रतिक्रिया दिली होती. यावर राऊतांना विचारले असता ते म्हणाले, धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, असं म्हणत राऊतांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ज्यांचं जळतं त्याला कळतं असही राऊत म्हणाले. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षासोबत उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपसारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही, असंही राऊत म्हणाले.
मी राजकीय नेत्यांवर थुंकलो नाही
थुंकल्याबद्दल माफी मागण्याबाबत राऊतांना विचारले असता, ते म्हणाले, रोज 130 कोटी जनतेला माफी मागावी लागेल. रोज कोणी ना कोणी थुंकत असतात. मी सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही. मी राजकीय नेत्यांवर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो, हा फरक आहे. ज्यांनी महाराष्ट्र , शिवसेना , ठाकरे कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत बेईमानी केली, त्यांचं नाव समोर आल्यावर माझी जीभ चावली गेली, त्यातून ती कृती झाली. यांना काही कळतं का? त्यांना रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र कळतं का? माझ्या इतकं चांगलं संतुलन कोणाचंच नाही. माझ्यामुळे अनेकांचे संतुलन बिघडलं, असंही संजय राऊत म्हणाले.
मला सुरक्षेची गरज नाही
मला सुरक्षेची अजिबात गरज नाही. मी त्र्यंबकेश्वरला जातोय. सगळे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. मंदिरात जाऊन आम्ही धार्मिक विधी करुन परत येऊ. ज्यांनी बेईमानी केली त्यांच्यामागे सुरक्षा आहे. मी सुरक्षेची मागणी केली नाही. ज्यांना ही सुरक्षा पाठवली त्यांना परत पाठवा असंही संजय राऊत म्हणाले.