“सध्या माथाडी चळवळीला बदनामीचेचं प्रयत्न सुरू”, पवारांकडून २१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन

0

हमाल माथाडी कामगारांच्या २१ व्या अधिवेशनाचे आज अहमदनगर येथे उद्घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माथाडी कामगार आणि हमालांचे नेते दिवंगत शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. याप्रसंगी शरद पवार म्हणाले, ज्यांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा माथाडी आणि हमाल या क्षेत्रात काम करणाऱ्या तुम्हा लोकांसाठी दिला ते लोकनेते शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण आज या ठिकाणी करण्यात आले. शंकरराव व त्यांचे सहकारी आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले. कष्टकऱ्यांमधून आलेले नेतृत्व, २५ वर्षे नगरसेवक, सात वर्षे या अहमदनगरचे नगराध्यक्ष आणि अनेक वर्षे माथाडी कामगारांसाठी खस्ता खाणारा नेता म्हणून शंकररावांची ओळख सगळ्यांना आहे. त्याचे कायमस्वरुपी स्मरण राहावे म्हणून या ठिकाणी शंकररावांचा पुतळा उभा केला.

आज देशामध्ये चित्र बदलते आहे. आज काही शक्ती आहेत ज्या देशाला ५० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जात-धर्म यावरुन सामान्य लोकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याची खबरदारी घेत आहेत. आज ज्या राजकीय पक्षाच्या हातात देशाची सत्ता आहे ती सत्ता कष्टकरी लोकांसाठी, समाजातील लहान घटकांसाठी वापरायची समज या राजकर्त्यांना नाही आहे. जातीच्या आणि धर्माच्या नावाने समाजात एक तेढ निर्माण केली जात आहे.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

शरद पवार म्हणाले, या अहमदनगर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर होऊन गेले. दोन दिवस झाले या जिल्ह्यात बाजारपेठ बंद आहे, जातीजातीमध्ये अंतर वाढवणे, संघर्ष वाढवणे हे काम काही शक्ती करत आहेत. या शक्तींशी संघर्ष करणे हे आव्हान तुमच्या आणि माझ्यासमोर आहे. हा संघर्ष केला नाही तर कष्ट करणारा हमाल, गिरणीतील कामगारांचं जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, या ठिकाणी हमाल माथाडी महामंडळाचे अधिवेशन भरलं आहे. अनेक कायदे आलेत. कारखानदारी वाढली, दरवर्षी ती वाढते. अनेक हातांना त्यामुळे काम मिळते. ते काम देत असताना जो काम करणारा आहे त्याला कायद्याने संरक्षण आहे. पण या कायद्याच्या संरक्षणावर हल्ला करण्याचे काम काही लोकांनी सुरू केलं आहे. माथाडी हमाल कायदा या देशामध्ये महाराष्ट्रात सुरू झाला आणि आज या कायद्याने कष्टकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली. परंतु आज काही लोक असे आहेत की त्यांना माथाडी कायदा खुपतो आहे. आज मालक वर्गाची एक मानसिकता वेगळी झाली आहे. संपत्ती मिळवायची आणि ठेवायचा अधिकार फक्त आमचा आहे आणि कष्ट करणारी जमात ही तुमची आहे. कष्ट करण्याचे काम तुमचे आणि धनसंपत्ती ठेवयाचे काम मालकांचे. त्यामुळे एक शुद्र, अति शुद्र असे वातावरण समाजामध्ये करून आज काही लोक मालकांच्या नावाने एक वेगळा निकाल घेत आहेत. तो निकाल त्यांना घ्यायचा असेल तर माथाडी कामगारांवर हल्ला करणे, त्यांना दुर्बल बनवणे ही भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे. आज हा कायदा सुखासुखी झाला नाही. मला आठवते की, महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यावेळी मी नुकताच निवडून गेलो होतो. अण्णासाहेब पाटील, बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील अशा अनेकांनी शक्ती पणाला लावली. मग गिरणी कामगार, माथाडी कामगार या सगळ्या लोकांची शक्ती तयार केली आणि त्यांच्यासाठी कायदा तयार करण्याचा निकाल घेतला. त्या कायद्याने तुमच्या जीवनात एक प्रकारची शाश्वती आली.

अधिक वाचा  पुण्यात रात्रीत सर्वात मोठी घडामोड; पवारांची बिन आवाजाची काठी चालली अन् ‘देवाभाऊं’चे मनसुबे उधळले

फडणवीस सरकारवर टीका
शरद पवार यावेळी म्हणाले, मध्ये सरकार बदललं आणि फडणवीस यांचे सरकार आले. त्यांनी काय केले तर या राज्यातील ३६ जिल्हे एकत्र करून एक नवीन राज्यव्यापी मंडळ स्थापन करण्याची भूमिका घेतली. त्या कायद्याला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आजही तो कायदा काही प्रमाणात शिल्लक आहे. काही जण असं सांगतात की, इथे गुंडगिरी आहे, इथे पैसे लुबाडण्याचं काम होतं. मी बाबा आढावांना ५०-६० वर्षे ओळखतो. उभ्या आयुष्यामध्ये कुणी गुंडेगिरी केली, कोणी पैसे लुबाडण्याचे काम केले तर बाबा आढाव कधीही त्यांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत व त्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. गुंडगिरीचा आरोप करून सबंध माथाडी चळवळीला एक प्रकारे बदनाम करण्याचे काम काही लोकं करतील, त्या सगळ्या लोकांच्या विरुद्ध तुम्हाला व आम्हाला उभे राहावे लागेल.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार