त्र्यंबकेश्वर घटनेची एसआयटी चौकशी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

0

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक सौहार्दाला धक्का लागेल अशा घटना घडत आहेत. अकोला आणि शेवगाव शहरात दंगल उसळल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला.

अशा घटनांच्या मालिकेमुळे राज्याला दंगलीचे टेन्शन सतावत असून काय होणार, अशी धाकधूक वाढली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱयाच्या नेतृत्वाखाली एसआयटी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

त्र्यंबकेश्वर मंदिरात शनिवारी रात्री 10 ते 12 जणांनी फुलांची चादर घेऊन आत शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखल्याने वाद निर्माण झाला होता. संदल मिरवणुकीतील हा जमाव होता. पुरोहित संघ, ब्राह्मण महासंघ, मराठा महासंघासह 15 संघटनांनी याप्रकरणी कारवाई करावी असे निवेदन पोलिसांना दिले होते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

आज गृहमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. तसेच एसआयटी केवळ याच घटनेची नव्हे तर गेल्या वर्षीच्या अशाच प्रकारच्या घटनेची चौकशी करेल असे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी मंदिरासमोरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून जमावातील युवकांना नोटीस बजावली आहे. त्र्यंबकेश्वरमधील कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

पाथर्डीमध्येही बंद

शेवगाव येथील घटनेच्या निषेधार्थ आज पाथर्डी शहर बंद ठेवत पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. हिंदू युवा रक्षा मंचच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेवगावमधील घडलेला प्रकार निंदनीय असून, आरोपींना कडक शासन झाले पाहिजे. रामनवमी, शिवजयंती, संभाजीमहाराज जयंती, रामनवमीच्या मिरवणुकीवेळेसच असा प्रकार का घडतो, याची चौकशी करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

शेवगावात बेमुदत बंद

नगर जिह्यातील शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवेळी दोन गटांत दंगल उसळली होती. यात मोठय़ा प्रमाणात दुकानांची आणि वाहनांची तोडपह्ड करण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून व्यापारी संघटना आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत बेमुदत बंद पुकारला आहे. सर्व दंगलखोरांना अटक केली जात नाही तोपर्यंत बंद मागे घेतला जाणार नाही, असा ठाम पवित्रा घेण्यात आला आहे. दरम्यान, या दंगलीप्रकरणी 153 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 31 जणांना अटक करण्यात आली आहे. शहरात अजूनही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

यामागे मोठे षड्यंत्रः मंदिर महासंघ

गेल्या काही दिवसांत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अकोला येथे घडलेल्या घटना आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार जाणीवपूर्वक सामाजिक तेढ वाढवण्यासाठी केल्याचे दिसते. यामागे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे षड्यंत्र असू शकते, अशी भीती व्यक्त करत महाराष्ट्र मंदिर महासंघाने कारवाईची मागणी नाशिकच्या पोलीस अधीक्षकांकडे केली.

चौघांवर गुन्हा दाखल

अकिल युसूफ सैयद, सलमान अकिल सैयद, मतीन राजू सैयद, सलीम बक्षू सैयद या चौघांविरुद्ध भादंवि कलम 295, 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराची पाहणी केली. त्र्यंबकेश्वर गावातील प्रतिष्ठत आणि देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांशी त्यांनी चर्चा केली.