“ओबीसी आरक्षण राज्य पुरस्कृत दरोडा”; पंतप्रधान मोदींना ‘राखी’ पाठवून हस्तक्षेपाची महाराष्ट्रातील ओबीसी कार्यकर्त्यांचे मागणी

0

पुणे: रक्षाबंधनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सुमारे ३५० ओबीसी जातींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्ते व नागरिकांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना ‘राखी’ पाठवून एक अनोखे आंदोलन छेडले आहे. या पत्राची प्रत लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांनाही पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणावर होत असलेला गदा रोखण्यासाठी पंतप्रधानांनी आपल्या रक्षणकर्त्याच्या भूमिकेतून तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी प्रतिनिधींनी सांगितले की, महाराष्ट्रात ओबीसी वर्गात समाविष्ट असलेल्या ३५० हून अधिक जाती या सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेल्या आहेत. हा थेट राज्य सरकारच्या पाठिंब्याने चालणारा ‘राज्य पुरस्कृत दरोडा’ असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

अधिक वाचा  हरित पुणे १०८ कोटी लाटले पण १० टक्केच काम; काँग्रेस गटनेते ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडून कारभार चव्हाट्यावर

“आम्ही राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व श्रीमती सुनेत्रा अजित पवार, ओबीसी कल्याण मंत्री श्री अतुल सावे, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री योगेश टिळेकर आणि इतर प्रमुख नेत्यांना वारंवार निवेदने दिली, पत्रे लिहिली आणि तक्रारी केल्या. मात्र, या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने आणि राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे,” असे आंदोलकांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण अनेक ठिकाणी शून्य झाले असून, ओबीसींचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले आहे. राज्य सरकारकडून कोणतीही आशा उरलेली नसल्याने, आता रक्षाबंधनाचे पवित्र प्रतीक असलेली राखी पाठवून पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील मूळ ओबीसींच्या हक्कांचे आणि आरक्षणाचे रक्षण करावे, अशी जोरदार अपील ओबीसी बांधवांनी केली आहे.

अधिक वाचा  महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या निर्णयामुळे निधीच्या वादावर तात्पुरता तोडगा पण महामंडळ वाटपचा मुहर्त अजूनही लांबणीवर