”सरकारी हिशोबानुसार ३० ऑगस्टपर्यंत देशात ८३ लाख टन साखर शिल्लक राहणे आवश्यक होते. मात्र, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने देशात ३५ लाख टन साठा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गायब झालेल्या सुमारे ४८ लाख टन साखरेच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयांचा महागैरव्यवहार झाला आहे,” असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.







येडगाव (ता. जुन्नर) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी यांनी भारत-अमेरिका मुक्त व्यापार करार, शेतकऱ्यांची कर्जमाफी व समस्या, वाढलेले साखरेचे बाजारभाव या संदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ”गायब झालेल्या साखरेची पाकिस्तान, बांगलादेश किंवा नेपाळमध्ये बेकायदेशीरपणे तस्करी झाली असावी किंवा साठेबाजांनी ती लपवून ठेवली असावी, असा संशय आहे. याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी स्वीकारावी.साखरेच्या झपाट्याने वाढलेल्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा साखर कारखानदारांना होण्याची शक्यता जास्त आहे. रिकवरीच्या माध्यमातून चोरलेल्या साखरेची विक्री काळ्या बाजारात होण्याची शक्यता आहे.
साखर कारखानदारांचेच नातेवाईक साखरेचे व्यापारी झाले आहेत. साखरेची वाढलेले दर पाहता कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन पाच हजार रुपयापर्यंत भाव देणे आवश्यक आहे.”
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, बाबाजी नेहरकर, गुलाबराव नेहरकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र काशीद, सतीश नेहरकर, देविदास भोर, सह्याद्री भिसे, राजू वायकर, सचिन थोरवे, भूषण औटी, अमित डोंगरे, प्रवीण डोंगरे, के. डी. सरोदे, आनंद ढवळे, नामदेव जाधव, योगेश तोडकर, वंदना वाघचौरे, सुजाता जाधव आदी उपस्थित होते. सह्याद्री भिसे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद खांडगे यांनी आभार मानले.













