पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळील वाकी येथे आज पहाटे तीन वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. एका भरधाव कंटेनर आणि टेम्पोची जोरदार धडक झाल्यानंतर टेम्पो जवळच असलेल्या कारवर पलटी झाला.अपघातानंतर कंटेनर महामार्गावर आडवा झाल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.







चाकणजवळील वाकी परिसरात आज भल्या सकाळी कंटेनर, टेम्पो आणि कार यांच्यात हा विचित्र अपघात घडला. कंटेनरला धडक दिल्यानंतर टेम्पो थेट एका कारवर जाऊन पलटी झाला. तर धडकेच्या तीव्रतेमुळे कंटेनर महामार्गाच्या मध्यभागी आडवा झाला. या अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळच्या गर्दीच्या वेळीच हा अपघात झाल्याने नोकरदार आणि वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
या भीषण अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला हलवण्याचे काम सुरू असून, वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटात मध्यरात्री भीषण अपघात झाला. करंजाळे येथे रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यासाठी टाकलेल्या खडीच्या ढिगावर कार पलटी होऊन पिकअप जीपला धडकली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. करंजाळे येथे रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्ग बंद असून वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यावर खडीचे ढिग टाकण्यात आले आहेत. अत्यविधीसाठी निघालेल्या कारचालकाला या ढिगाचा अंदाज न आल्याने कार पलटी होऊन पिकअप जीपला धडकली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. मध्यरात्री स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. मात्र, बंद मार्गावर पुरेसे सूचना फलक आणि सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघात होत असल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.













