देशातील तीन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. ३० वर्षे सत्ता असलेल्या बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला (भाजप) पराभवाचा सामना करावा लागला.तर गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मांजलपूर मतदारसंघात भाजपने आपला गड कायम राखत विजय मिळवला.







बिहारमधील हाय-प्रोफाइल मानल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला. या मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नितीन नवीन यांनी आमदारपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. मात्र गुजरातमधील मांजलपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सतीश गोविंदभाई पटेल यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भीखाभाई रबारी यांचा तब्बल ३०,६३० मतांच्या फरकाने पराभव केला.
या निकालांनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “तीन विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रतेने स्वीकारतो. बांकीपूर आणि दतिया येथील निकालांचे अत्यंत गांभीर्याने आत्मपरीक्षण करू. नव्या ऊर्जेसह आणि नव्या संकल्पाने आम्ही पुन्हा जनतेमध्ये जाऊ आणि त्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने काम करू. “याशिवाय त्यांनी गुजरातमधील मांजलपूर मतदारसंघातील जनतेचे भाजपवरील विश्वासाबद्दल आभार मानले. तसेच या विजयासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, “मांजलपूरच्या जनतेने भाजपवर पुन्हा विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या विजयासाठी सर्व समर्पित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन,” असेही त्यांनी म्हटले.













