भारत-अमेरिका प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्लीत आंदोलन छेडले असून, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेले माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. राजघाट परिसरात शेतकरी नेत्यांना रोखताना पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ शाब्दिक चकमकही झाली.







देशातील १५४ हून अधिक शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘देश बचाओ मोर्चा’च्या माध्यमातून दिल्लीत आंदोलनाची हाक दिली होती. पंजाबमधील शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले होते. आंदोलनासाठी देशभरातील शेतकरी किसान घाट आणि राजघाट परिसरात एकत्र आले.
यावेळी राजू शेट्टी यांनी पोलिसांकडे आंदोलन शांततेत करण्याची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांच्यासह महादेव जानकर आणि इतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा शेट्टी यांनी केला. तसेच, पोलिसांनी आपल्याला बसमध्ये बसवून अज्ञात स्थळी नेल्याचा आरोपही त्यांनी केला.
ट्रेड डीलमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार, संघटनांचा आरोप
शेतकरी संघटनांचा आरोप आहे की, भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराबाबत केंद्र सरकारने शेतकरी संघटनांशी कोणतीही चर्चा केलेली नाही. हा करार झाल्यास अमेरिकेतून स्वस्त दरात सोयाबीन, धान्य, दुग्धजन्य पदार्थ आणि ड्रायफ्रूट्स मोठ्या प्रमाणावर भारतात आयात होतील. त्यामुळे देशातील लहान शेतकरी, शेतमजूर आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे.
शंभू आणि खनौरी सीमेवर कडेकोट बंदोबस्त
दरम्यान, पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू आणि खनौरी सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि अर्धसैनिक दल तैनात करण्यात आले आहे. प्रशासनाने शंभू बॉर्डर पूर्णपणे सील करत परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ लागू केले आहे. मोठे काँक्रीट बॅरिकेड्स, स्लॅब तसेच ट्रक उभे करून दिल्लीकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. दिल्ली-कटरा द्रुतगती मार्गावरही वाहतूक रोखण्यात आली असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी पंजाबकडून हरियाणात कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.













