चला जाऊ पंढरीला । विठ्ठल भेटेल आपल्याला ।।१।।







वाटे चालता पाय थकती । तरी सुख वाटे चित्ती ।।२।।
नामदेव म्हणे काया वेचा । तरी भेटी होय साचा ।।३।।
या अभंगाची प्रचीती देणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाचा भक्तिमय सोहळा बुधवारी (ता.८) आळंदीमध्ये अनुभवायला मिळाला. राज्यभरातून आलेले भाविक आणि वारकरी अगदी तल्लीन होऊन सहभागी झाल्याचे दिसून आले.
कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत अवघ्या महाराष्ट्रातून आलेले दोन लाखांहून अधिक वैष्णव ‘माउली माउली’च्या जयघोषात न्हाऊन निघाले होते. पावसाचे तुषार झेलत चिंब झालेले वारकरी भक्तीरसातही न्हाउन निघाले. संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी’ कोणतीही तमा न बाळगता वारकरी अलंकापुरीत दाखल झाले होते.
सकाळपासून पावसाच्या सरी अंगावर झेलत वैष्णवांच्या मेळ्याने अवघी अलंकापुरी टाळ-मृदंगाच्या गजराने आणि माउली नामाच्या अखंड जयघोषाने आज दुमदुमून गेली. घराण्यात परंपरेने चालत आलेली आपली वारी विठूरायाच्या चरणी समर्पित करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत आले होते.
पावसाचा रेड अलर्ट असूनही वारकरी मोठ्या संख्येने आळंदीत पोहोचले. दोनशेहून अधिक छोट्या-मोठ्या दिंड्या दाखल झाल्या. रथापुढे सत्तावीस दिंड्या, रथामागे दोनशे एक आणि तात्पुरते क्रमांक दिलेल्या दिंड्या वारीत सहभागी होण्यासाठी आळंदीत आल्या. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी सुमारे दोन लाख भाविक आळंदीत दाखल झाले. दोन दिवस पाऊस असूनही वारकऱ्यांचा उत्साह कमी झाला नव्हता.शहरात ठिकठिकाणी राहुट्या आणि धर्मशाळांमधून हरिनामाचा गजर आणि हरिपाठ पारायण सुरू होते. वडिवळे आणि आंद्रा धरणातून विसर्गाचे प्रमाण कमी केल्यामुळे पुराचे पाणी ओसरले होते. पोलिसांकडून वारंवार इंद्रायणी घाटावर, पुलावर न जाण्याचे आवाहन करण्यात येत होते. पुलाचे रस्ते जागोजागी बॅरिकेटिंग करून बंद केले होते. वैष्णवांच्या या अलोट गर्दीने संपूर्ण शहर गजबजले होते. गल्लीबोळात वारकऱ्यांच्या भजनाने वातावरण प्रसन्न झाले होते.
भक्तीरसात तल्लीन झालेल्या महिला-पुरुष वारकरी आनंदाने हातात हात घेत फुगड्या खेळत होते. वारकऱ्यांचे खेळ मोबाइल, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हौशी लोकांची गर्दी दिसून येत होती. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त अधिक होता.
दरम्यान, आज पहाटेपासूनच माउलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी गर्दी होती. दर्शन मंडप पाण्यात गेल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून दर्शनासाठीची रांग महाद्वारातून चावडी चौक येथून पोलिस चौकीकडे वळवली होती. दुपारी बारानंतर मात्र वारकऱ्यांना वेध लागले ते मुख्य प्रस्थानच्या कार्यक्रमाचे. माउलीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेटिंग करून फक्त दिंड्यांनाच सोडण्याचे नियोजन केले होते. प्रत्येक दिंडीतील दहा वारकऱ्यांऐवजी आता पन्नास वारकरी सोडण्याचा निर्णय देवस्थानने घेतला.













