महाराष्ट्रात २१ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; गोवा, कारवार मोठे ढग दाटले; पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता

0

महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकण आणि राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुंबईत सकाळपासून सुरू झालेला पावसाचा जोर आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३ जुलै ते ६ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात, उत्तर कोकण, गोवा आणि कारवार परिसरात दिवसभर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळपासून गेल्या काही वेळात पावसाचा जोर वाढला असून, मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे.

अधिक वाचा  आजपासून राज्यातील पाण्याच्या दरात दुप्पट वाढ; मंजूर कोट्यापेक्षा अधिक वापर केल्यास दीडपट ते तीन पट दर

ताज्या उपग्रह आणि रडार निरीक्षणानुसार महाराष्ट्रासह मध्य भारतातील अनेक भागांवर दाट पावसाळी ढग सक्रिय झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पुढील तीन ते चार तास अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोकणात ऑरेंज आणि यलो अलर्ट

हवामान विभागाने पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज

अधिक वाचा  एकलव्य कॉलेज ‘मिसिंग लिंक’ महानगरपालिकेचे सकारात्मक पाऊल; नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या पाठपुराव्याला यश

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत मान्सूनच्या पुढील प्रगतीस पोषक वातावरण असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांचा १५२ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न