हवामान प्रणालीचा पावसावर परिणाम पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम







शहरात रविवारी (ता. ५) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रविवार सुट्टीचा दिवस असूनही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर पुढील दोन ते तीन दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून, पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर घाट परिसरासाठी ‘रेड’ अलर्ट जारी केला आहे.
शहर आणि परिसरात रविवारी पहाटेपासूनच हलक्या स्वरूपाच्या सरी सुरू झाल्या होत्या. दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळनंतर मात्र पावसाचा जोर वाढला. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला. सलग चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कमाल आणि किमान तापमानातही घट झाली. रविवारी शहराचे कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनूसार, मॉन्सूनची उत्तरी सीमा सध्या स्थिर असून दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीदरम्यान द्रोणीय रेषा सक्रिय आहे. तसेच वायव्य बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीलगत तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र रविवारी डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले असून ते त्याच भागात स्थिर आहे. या हवामान प्रणालीचा राज्यातील पावसावर परिणाम होणार आहे. दरम्यान शहर आणि परिसरात सोमवारी (ता. ६) तापमानात फारसा बदल होणार नाही. सकाळी आकाश मुख्यतः निरभ्र राहील, मात्र दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होऊन शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मात्र, याच वेळी घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
सुटीच्या दिवशीही वाहतूक कोंडी
रविवारी सुटीचा दिवस असला तरी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सततच्या पावसामुळे शिवाजीनगर, स्वारगेट, हडपसर, कात्रज, कोथरूड, सिंहगड रस्ता, बाणेर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला. परिणामी सलग दुसऱ्या दिवशीही वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागला.













