पुणे | प्रतिनिधी: वारजे माळवाडी येथील स्मशानभूमीमध्ये सुरू असलेल्या सेवा रस्त्याच्या उड्डाणपूलाच्या कामांमुळे काकस्पर्श घाट आणि निवारा छत्रांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. उड्डाणपुलाच्या कामाच्या नावाखाली पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विद्यमान सुविधांचे नुकसान झाल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.






सेवा रस्त्याचे उड्डाणपूल काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराकडून काकस्पर्श घाटाच्या परिसरात प्रचंड खोदकाम आणि तोडफोड करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी फरशी, मुख्य स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते आणि इतर सुविधा उखडलेल्या अवस्थेत आहेत. तसेच अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा छत्रांचेही पत्रे उघडल्याने प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
शहरात सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय अधिक वाढली आहे. आपल्या परिसरातील विकास व्हावा या उदात्त हेतूने नागरिकांनी सत्ताधारी असलेल्या पक्षाचे सर्वच्या सर्व नगरसेवक विजयी केले तरीसुद्धा या भागातील विकासाची कामे रखडलेली असून लोकांना नाहक त्रास सहन करण्याशिवाय पर्याय उरला नाही. आप्तेष्ठ व नागरिकांना या दुःखद प्रसंगीही चिखल, उखडलेले रस्ते आणि अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची चौकशी करून झालेल्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच काकस्पर्श घाट आणि निवारा छत्रांची तातडीने दुरुस्ती करून स्मशानभूमीतील सर्व मूलभूत सुविधा पूर्ववत कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.













