जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम आता भारतात दिसू लागला आहे. देशातील मोठी इंधन विक्रेता खाजगी कंपनी ‘नायरा एनर्जी’ने पेट्रोलच्या दरात ५ रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात ३ रुपये प्रति लीटर कपात केली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक कालावधीत एखाद्या कंपनीनं इंधनाचे दर कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशभरात नायरा एनर्जीचे ७,००० पेक्षा जास्त पेट्रोल पंप आहेत. मात्र, राज्यांच्या स्थानिक करांच्या (VAT) रचनेनुसार वेगवेगळ्या राज्यांत या इंधनाचे प्रत्यक्ष दर वेगवेगळे असू शकतात.






विशेष म्हणजे, इराण संघर्षानंतर याच कंपनीनं सर्वात आधी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवल्या होत्या. इराणमधील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले होते, ज्यामुळे नायरा एनर्जीनं २६ मार्च रोजी पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपयांनी महाग केलं होतं. आता कंपनीनं दरात कपात करून ही जुनी दरवाढ एक प्रकारे पूर्णपणे मागे घेतली आहे. नायरा एनर्जीची गुजरात मधील वाडिनार येथे वार्षिक २० मिलियन (२ कोटी) टन क्षमतेची ऑइल रिफायनरी आहे.
कच्च्या तेलाच्या दराची सद्यस्थिती
पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली असून, त्या इराण युद्धापूर्वीच्या पातळीवर आल्या आहेत. आजच्या व्यवहारात ब्रेंट क्रूडमध्ये ०.४२% ची किरकोळ वाढ झाली असून ते सध्या ७३.२६ डॉलर प्रति बॅरलवर ट्रेड करत आहे.
सरकारी कंपन्यांचे दर जैसे थे
नायरा एनर्जीनं ग्राहकांना दिलासा दिला असला, तरी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या कंपन्यांनी दरांमध्ये कोणताही बदल जाहीर केलेला नाही. देशातील तब्बल ९० टक्के पेट्रोल पंप याच सरकारी कंपन्यांचे आहेत. यापूर्वी मे महिन्यात या सरकारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकूण ७.५० रुपये प्रति लीटरची वाढ केली होती.











